पाथर्डी : तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून जाण्याचा प्रयत्न करणारा अतुल रावसाहेब शेलार (वय 31, रा. शिरापूर) हा तरुण वाहून गेला. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Ahilyanagar News)
मिळालेल्या माहितीनुसार, तिसगाव-शिरापूर-घाटशिरस या रस्त्यावर असलेल्या पुलावरून नदीला पाणी वाहत होते. दरम्यान, अतुल शेलार हा पूल ओलांडत असताना अचानक तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहात सापडला आणि काही क्षणातच पाण्यासोबत वाहून गेला. घटनेची माहिती समजताच तहसीलदार उद्धव नाईक हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मागील रविवारी आणि सोमवारी पाथर्डी तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. त्यानंतर अधूनमधून पाऊस बरसत आहे. डोंगर भागात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी वस्ती भागाला पाण्याचा फटका बसला आहे. शनिवारीही जोरदार पावसामुळे शिरापूर नदीला पूर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली.
दरम्यान, तिसगाव-मढी रस्त्यावरही एका ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन भाविक दुचाकीसह अडकल्याची घटना घडली. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला. तिसगाव येथील मुख्य नदीला पूर आला असून नदीचे पाणी पुलाला लागले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नदी-नाले, ओढे-पूल परिसरात पावसाच्या दिवसात जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून नागरिकांना सतत देण्यात येत आहेत.
दरम्यान, शनिवारी रात्री नगर शहर आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्री आठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल तास-दीड तास जोरदार कोसळत होता. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पावसाच्या धारा सुरूच होत्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.