नगर: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ पालखी सोहळा मार्केट यार्डमध्ये दरवर्षीप्रमाणे दोन दिवस मुक्कामी होता. तीन दिवस रामकृष्ण हरीच्या गजराने मार्केट यार्ड परिसर दुमदूमला होता. संत श्री निवृत्तनाथ महाराज यांच्या पालखीतील पादुकांची आज हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेविका नीता घुले यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात आल. त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेविका नीता घुले, संजय घुले, चैतन्य घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, मधुकर केकाण, सचिव संजय महापुरे, अशोक बाबर, सतीश शेळके, अनुरथ कदम, बहिरू कोतकर, रविंद्र भोसले, बबन आजबे, नवनाथ बडे, मंदाबाई सूर्यवंशी, रतनबाई आजबे, कमलबाई ढाणे, राहिबाई गायकवाड, नारायण गिते, लक्ष्मण वायभासे, सुनील गिते आदी उपस्थित होते.
हमाल पंचायतच्यावतीने शिपी आमटी-भाकरीचा प्रसाद वारकऱ्यांना देण्यात आला. यासाठी १०० पेक्षा जास्त महिला कामगारांनी सेवा दिली. या दिंडीच्या स्वागतासाठी गेल्या तीन दिवसांपासून हमाल पंचायतचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. या दिंडीतील वारकऱ्यांना चहा, नाष्टा, जेवण, राहण्याची सुविधा, औषधोपचार आदींसाठी पदाधिकारी, व्यापारी, हमाल-मापाडी, कष्टकऱ्यांनी घरातील कार्य असल्याप्रमाणे या वारकर्यांची सेवा केली.
हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, आषाढी वारीला पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो भाविक दिंडीतून जातात. या वारीत गरीब-श्रीमंत, जात-पात, रंगरुपाचा भेद नसतो. महाराष्ट्रातील संतांचे विठोबा हे दैवत आहे. अशा या वारीत आगळी-वेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या वारकऱ्यांच्या सेवेतच पांडुरंगाचे दर्शन होते. या कष्टककऱ्यांच्या जीवनातील संकटे दूर होऊ दे! त्यांच्या जीवन सुख-समृद्धी होऊ दे अशी प्रार्थना आज विठ्ठूरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.