Pune Nashik Railway Route Pudhari
अहिल्यानगर

Nashik Pune Railway Route: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने संगमनेरमध्ये संताप; तरुणांच्या स्वप्नांवर पाणी

हायस्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी; विकास आणि रोजगाराच्या संधी हिरावल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: नाशिक-पुणे या शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वेमार्गामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. रेल्वेमुळे या विभागाच्या विकासासाठी ऐतिहासिक काम होणार होते. यापुर्वी भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना पाचशे कोटी पेक्षा जास्त रकमा दिल्या. मात्र, सत्ता बदल झाल्यानंतर हा मार्ग बदलल्याने संगमनेरच्या विकासाला मोठा खो बसणार असून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तर तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवल्याची भावना निर्माण झाली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे येथे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग शिर्डी मागेच होणार असल्याचे जाहीर केल्याने त्याचे तीव्र पडसात सध्या उमटत आहे. विशेषता तरुण, व्यापारी, व्यावसायिक संतप्त झाले आहे. रेल्वे सरळ मार्गेच व्हावी, अशी मागणी करत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा गोल्डन ट्रँगल असून यामधील पुणे व नाशिक शहराला जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वेसाठी नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, चाकण, पुणे हा अत्यंत सरळ मार्ग सोयीचा आहे.

यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यानंतर ही रेल्वे मंजूर झाली. या मार्गावरील अनेक जमिनी संपादित होऊन या शेतकऱ्यांना सुमारे पाचशे कोटींपेक्षा अधिक रकमा अदा केल्या‌. मात्र, फक्त राजकारण करण्यासाठी संगमनेरची रेल्वे आता पळल्याचा आरोप होत आहे. संगमनेर तालुका शेती, शिक्षण, सहकार, आर्थिक विकास यामधून राज्यात अग्रगण्य ठरला आहे. यामध्ये रेल्वेने अधिक भर पडणार होती. याचबरोबर या विकासाला मोठी गती मिळणार होती. मात्र, संगमनेरच्या विकासाला खो घालण्यासाठी ही रेल्वे जाणीवपूर्वक राजकीय हेतू ठेवून पळवली आहे. रेल्वेचा मार्ग नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर, पुणे, असा झाल्यानंतर पुणे ते पुणतांबा यावर अनेक टीका झाली.

युवकांमध्ये मोठी नाराजी

आम्ही आयटी विभागात पुणे येथे काम करत असून यामुळे आयटी मधील सर्व युवकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची भावना आशिष रामकर यांनी व्यक्त केली आहे.

जीएमआरटीचे कारण दाखवून मार्ग बदलण्याचा घाट

नाशिक-पुणे शहरांना जोडणारा सरळ रेल्वेमार्ग हा मंजूर होऊन शेतकऱ्यांना पैसेही दिले होते. मात्र, जीएमआरटीचे कारण दाखवून मार्ग बदलण्याचा जो घाट घातला आहे. तो अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये मोठा संताप असून केंद्र व राज्य सरकारने सरळ रेल्वेमार्गच करावा ही आमची प्रमुख मागणी असल्याचे युवा काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

मुद्दाम डाव खेळला; शरमाळे यांची टीका

नाशिक व पुणे हे आयटी व एमआयडीसीसाठी मोठे केंद्र आहे. यामधून मोठे रोजगार युवकांना उपलब्ध होणार आहे. येण्या जाण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर शेतमाल विक्रीसाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे. असे सगळे असताना या विभागाला रोखण्यासाठी हा मुद्दाम डाव खेळला जात असल्याची टीका समनापुरचे शेतकरी भास्कर शरमाळे यांनी केली आहे.

जास्त संधी मिळणार होत्या

आम्ही नोकरीसाठी पुण्यात असून रेल्वेमुळे सर्व नागरिकांना सोय होणार होती. अनेक युवकांना नोकरीसाठी जास्त संधी मिळणार होत्या. मात्र, हे स्वप्न भंगले असल्याची चास येथील अभियंते संजय खैरनार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT