संगमनेर: श्री क्षेत्र निझर्णेश्वराच्या अध्यात्मिक स्थळी असलेल्या नैसर्गिक संपन्नतेचा उपयोग करून दूधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट सफारी प्रकल्प निर्माण होत आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
वन विभागाने यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सहायक वनसंरक्षक अमरजित पवार, गणेश मिसाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी सागर केदार, सुभाष सांगळे, सुनिल सांळुखे उपस्थित होते. वन विभागाने बिबट सफारीचा तयार केलेला प्रकल्प आराड्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक संपन्नतेला कुठही धक्का न लावता त्याचे संवर्धन करूनच बिबट सफारी प्रकल्पाचे काम झाले पाहीजे. ताडोबा येथील आराखडा नजरे समोर ठेवून हा प्रकल्प उभा राहावा, अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिबट्यांसाठी तयार करण्यात येणारे पिंजरे 25 फुट उंचीचे असून, पर्यटकांना फिरण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, रस्ते, सौर उर्जेचा वापर करून पथदिवे उभारणीचा अंतर्भाव प्रकल्प आराखड्यात करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या. पाण्याची उपलब्धता करून देण्यास जलसंपदा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल आशी ग्वाही त्यांनी बैठकीत दिली. श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानाचे अध्यात्मिक महत्व आहेच. त्याला निसर्ग पर्यटनाची जोड मिळाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
150 जागेवर प्रकल्प
दुधेश्वर आणि गोरक्षगड परिसरातील निसर्ग संपन्नतेचा उपयोग करून बिबट सफारी निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने वन विभागाने आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला असून, दुधेश्वर आणि गोरक्षगड यामधील सुमारे 150 एकर जागेचा उपयोग करून दोन स्वतंत्र बिबट सफारी उभारण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांंनी दिल्या.
निझर्णेश्वरेच्या अध्यात्मिक स्थळी निर्माण होणारा बिबट सफारी प्रकल्प सर्वासाठी पथदर्शी ठरेल असा निर्माण करायचा असल्याने प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही. कामाला सुरूवात करा, हवा तेवढा निधी देतो. मात्र काम करताना निसर्गाची कुठेही हानी आणि निधीचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्या.राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री