आश्वी: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. शिबलापूर-आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथील वृद्ध महिला लहानबाई मच्छिंद्र वनवे यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने बुधवारी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात 10 शेळ्या आणि 1 बोकड जागीच ठार झाला. त्यामुळे वनवे कुटुंबाचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लहानबाई वनवे यांनी आपल्या घरामागे 10 बाय 15 आकाराच्या पत्र्याच्या गोठ्यात 10 शेळ्या, 1 बोकड आणि 3 छोटी कोकरे बांधलेली होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्याच्या पाठीमागून असलेल्या एका अरुंद फटीतून आत प्रवेश केला. गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त असल्याने बिबट्याला बाहेर पडायला जागा मिळाली नाही.
शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने एकामागून एक सर्व 14 प्राण्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने 11 प्राण्यांना फस्त केले, तर 3 छोटी कोकरे सुदैवाने वाचली आहेत. हल्ल्यानंतर बिबट्याने 5 शेळ्या ओढत नेऊन जवळच 50 फुटांवर असलेल्या ऊसाच्या शेतात नेल्या. सध्या बाजारात एका शेळीची किंमत 20 ते 25 हजार रुपये असून एकाच रात्रीत अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक ककार्यकर्ते प्रकाश शिंदे आणि गावातील तरुणांनी ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. यावेळी त्यांना उसात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. बिबट्या समोर दिसल्याने भीतीपोटी ग्रामस्थ पुन्हा घराजवळ आले. त्यानंतर वनपाल सुजीत बोकडे, वनकर्मचारी सूळ, गागरे आणि शेख यांना तातडीने फोनवरून माहिती देण्यात आली. कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असले, तरी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना येण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नुकसानग्रस्त महिलेला योजनेचा लाभ द्या
मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत गोरगरिबांच्या उदर निर्वाहाकरिता शेळी पालन योजना सुरू केल्याने नुकसानग्रस्त लहानबाई वनवे या वृयोवृध्द महिलेला तातडीने या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. त्यामुळे तातडीने पिंजरा लावून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोंद्रे, एकनाथ नागरे, जालिंदर बोंद्रे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.