संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने अनधिकृत ठिकाणी खतसाठा करून बिल न देता विक्री केल्याचा प्रकार तालुक्यातील चंदनापुरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाने शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर कारवाई करत दुकानातून ३ हजार ७२४ रुपये किमतीच्या १४ युरिया गोण्या जप्त केल्या. कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी मंगेश रहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांनी दिली.
चंदनापुरी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्र या दुकानात युरियाची गाडी उतरवून त्याची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तंत्र अधिकारी किरण विरकर व गुण नियंत्रण अधिकारी ओमकार यन्नम यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता काही शेतकरी युरिया खताच्या बॅगा घेऊन जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.तर दुकानासमोर एका शेतकऱ्याकडे आर.सी.एफ. कंपनीच्या युरियाच्या दोन बॅगा आढळून आल्या. चौकशी केली असता त्याने सदर खत शिवकृपा कृषी सेवा केंद्रातून खरेदी केल्याचे सांगितले. बिल मागितले असता दुकानदाराने बिल दिले नसल्याचे त्या शेतकऱ्याने सांगितले.
पथकाने दुकानमालक मंगेश रहाणे यास बोलावून दुकान उघडून तपासणी केली असता दुकानात रासायनिक खतांच्या विक्रीची अधिकृत बिले न देणे, बिलांच्या नोंदी व्यवस्थित न ठेवणे आणि पॉस मशीनवर युरिया खताच्या साठ्याची नोंद नसणे, अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. दरम्यान, दुकानाशेजारी असलेल्या गाळ्याबाबत रहाणे यांच्याकडे विचारणा केली असता सदर गाळा त्यांच्या खतविक्रीच्या परवान्यात समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले. तो गाळा उघडला असता त्यात अनधिकृतपणे साठवून ठेवलेला युरियाचा साठा आढळून आला. ते खत आपलेच असल्याचे दुकानदाराने मान्य केले. दुकानाचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांना पाठविल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी रेजा बोडके यांनी दिली.
नांदुरी दुमाला ग्राहक सेवा केंद्रचालकावर गुन्हा
मुरलीधर साबळे यांच्या जनधन खात्यातील ३० हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या बँकेच्या खात्यात वर्ग करण्याच्या नावाखाली स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रचालकाने रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केली. चौकशीनंतर फसवणूक झाल्याचे उघड होताच संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ग्राहक सेवा केंद्रचालक गणेश लक्ष्मण दुधवडे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदुरी दुमाला येथील मुरलीधर साबळे यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया, संगमनेर येथे खाते आहे. त्यांच्या जनधन खात्यावर २२ सप्टेंबर २०२३ रोजी ८ लाख रुपये जमा झाले होते. एवढी मोठी रक्कम जनधन खात्यात ठेवता येत नाही, असे सांगून ग्राहक सेवा केंद्र चालक गणेश दुधवडे यांनी साबळे यांना फोन केला. ही रक्कम तुम्हाला तुमच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यावर वर्ग करावी लागेल, असे सांगितले. साबळे यांनी दुधवडे याच्यावर विश्वास ठेवला. सुट्टीच्या दिवशी दुधवडे हा साबळे यांच्या घरी गेला आणि त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन एक रुपया त्यांच्या ॲक्सिस बँके खात्यावरती वर्ग केल्याचे दाखविले आणि उर्वरित रक्कम नंतर वर्ग करतो, असे सांगून तो निघून गेला. मात्र त्यानंतर साबळे यांच्या मोबाईलवर आलेल्या बँक व्यवहाराच्या माहितीत ६० हजार रुपये अपेक्षित खात्यावर वर्ग न होता त्यापैकी ३० हजार रुपये गणेश दुधवडे यांच्या वैयक्तिक खात्यावर, तर उर्वरित ३० हजार रुपये दुधवडे याच्या फिया टेक्नॉलॉजी या खात्यावर असे एकूण ६० हजार रुपये जमा झाले जमा झाले. साबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर फसवणूक झाल्याचे सांगत पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर दुधवडे यांनी साबळे यांच्या खात्यावर ६० हजार रुपये परत वर्ग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराने आपली तसेच इतर खातेदारांची ही फसवणूक झाल्याचा संशय असल्याचे साबळे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे