Power Cut Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Electricity Problem: संगमनेरमध्ये उष्णतेचा कहर; 40 अंश तापमानात वीज पुरवठा खंडित, नागरिक हैराण

उकाड्याने जनता त्रस्त; ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने संताप वाढला

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: शहरासह तालुक्यात सध्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अशातच दुपारी व रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध नाराजीचा सूर आळवला जात आहे.

यंदा मार्च महिन्यातचं तप्त उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात सुरुवातीला उन्हाची तीव्रता कमी होती, मात्र हळू-हळू ती वाढली. संगमनेरात मे महिन्यात पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. उन्हाचा त्रास सर्वच नागरिकांना होत आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सततच्या उष्णतेमुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

सकाळी 9 वाजेनंतरच उन्हाचे चटके जाणवतात. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊन जाणवते. उन्हापासून बचाव करण्यासाठी अबाल-वृद्ध थंड पेयांचा आधार घेत आहेत. कुलर, पंखे यासह एसी वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. दुपारी ग्रामीण भागात जणू अघोषित संचार बंदिचं सुरु होत आहे. शहरातही गर्दी मंदावते. अशातचं लग्न सराई असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. अशातच वीज वितरण कंपनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, अचानक वीज पुरवठा खंडित करते. विशेषतः दुपारी व रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

उकाडा सहन होत नसल्यामुळे पंखे व कुलरची गरज असते, मात्र वीज पुरवठाचं खंडित होत असल्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत आहे. लोड शेडिंग सुरू नसल्याचे वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगत असले तरी, विजेची मागणी वाढल्याने पुरवठा करण्यात अडथळे येत आहेत. विशेषतः गुंजाळवाडी, घुलेवाडी, संगमनेर खुर्द, कासारवाडी, परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागात सतत वीज जाते. शहरातही वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी ठोस कारण सांगत नाहीत. यंदा उन्हाचा चढता पारा पाहता, आणखी काही दिवस उष्णतेची तीव्रताा जाणवणार आहे. यंदा तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार गेल्यामुळे विदर्भातील तापमानाची चर्चा येथे होत आहे.

शहरी भागात फारशी अडचण येत नाही. वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे. ग्रामीण भागात मात्र सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत विजेची मागणी वाढते. यामुळे कधी- कधी वीज पुरवठा खंडित होत आहे.
प्रदिप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT