Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: समता पतसंस्थेवर ईडीची धाड; बनावट खात्यांतून 60 कोटींचे व्यवहार उघड

राहाता शाखेत 11 तास तपास; अशोक खरात प्रकरणात घोटाळ्याची व्याप्ती वाढली

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरात याने बनावट बँक खाते उघडून कोट्यवधींचे व्यवहार केलेली राज्य पतसंस्था फेडरशेनचे अध्यक्ष काका कोयटे यांची समता पतसंस्था आता आणखी अडचणीत सापडली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी (दि. 13) समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत जाऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. सुमारे अकरा तासांपेक्षा अधिक काळ हे पथक संस्थेत तळ ठोकून होते. दरम्यान, प्रतीभा चाकणकरांनी काल शिर्डी पोलिसात हजर राहून संबंधित चार खाती आपली नसल्याचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे ‌‘समता‌’च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची 50 कोटींची चार एकर जमीन अशोक खरात याने अवघ्या पाच कोटींमध्ये घशात घातली. याप्रकरणी खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना भोंदू खरातचे आर्थिक पाळेमुळे समता पतसंस्थेपर्यंत पसरल्याचे समजले. शिर्डी पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत परिवहन अधिकारी, राजकीय नेते, उद्योजक अशा 57 लोकांच्या नावे 100 बँक खाती उघडण्यात येऊन, त्यातून 60 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाल्याचे तपासात पुढे आले. या सर्व खात्यांना खरात नॉमीनी होता. त्याचेच मोबाईल नंबर लिंक असल्याने ही खाते बनावट असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी संबंधित खातेदारांना चौकशीसाठी बोलावले असता, कालअखेर 57 पैकी 35 पेक्षा अधिक लोकांनी आपण समता पतसंस्थेत कधीही आलो नाही, त्यामुळे खाते उघडण्याचा आणि त्याद्वारे व्यवहार करण्याचा संबंध नाही, असा जबाब देताना खाते उघडण्यासाठी घेतलेल्या अर्जावरील स्वाक्षऱ्या आपल्या नाहीत, असेही लेखी सांगितले. यातील, दिनेश परब या व्यावसायिकाने आपल्या आधार आणि पॅनकार्डचा अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने दुरूपयोग केल्याची फिर्याद शिर्डी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी खरात याच्यासह समताच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, व्यवस्थापकाला अद्याप अटक झालेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यातच काल सोमवारी ईडीची एन्ट्री झाल्याने हे प्रकरण गंभीर बनत चालल्याचे मानले जात आहे.

सोमवारी सकाळी 9 वाजता एका चारचाकी गाडीतून मुंबईचे एक पथक समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत दाखल झाले. चार अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. तर दोन बंदुकधारी गार्डही सोबत होते. संबंधित बँक खाती, त्यावरील व्यवहार यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी करत ती तपासणीसाठी ताब्यात घेतली. याशिवाय व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांकडूनही त्यांनी काही उत्तरे जाणून घेतल्याचेही सूत्रांकडून समजले. महिलांना कार्यालयातून सोडून देण्यात आले. मात्र मॅनेजर व इतर कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती.

नगर पोलिसांकडूनच कागदपत्रे ‌‘ईडी‌’कडे

भोंदू खरात प्रकरणात पहिल्यापासूनच अहिल्यानगर, विशेषतः शिर्डी पोलिसांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्याच दिवशी अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रात्री उशिरा एका पत्रासह समता आणि जगदंबा या पतसंस्थांतील व्यवहारांसंदर्भातील ‌‘समरी‌’, आवश्यक कागदपत्रे ईडीकडे पाठवले होते. याच कागदपत्रांच्या आधारे आता ईडीने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत काय काय समोर येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT