

कोळगाव: राह फाउंडेशनचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि डॉ. सारिका गिरीश कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, कोथूळ व चिखली या गावांमध्ये तलाव गाळमुक्ती व खोलीकरणाच्या कामांना सुरुवात केली आहे उपक्रमामुळे परिसरातील पाणीटंचाई कमी होऊन तलाव गाळमुक्ती व खोलीकरणाने पाणीसाठ्या मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुलकर्णी दाम्पत्याने आतापर्यंत शेतीव्यवसाय, पर्यावरण व नऊ हजार एकर क्षेत्रावर वृक्षलागवड असे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. असाच उपक्रम श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र असणारे गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या मूळ गावासह तालुक्यातील इतर गावांच्या विकासासाठी स्वखर्चातून राह फाउंडेशनच्या वतीने हाती घेतला आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. तलावातील सुपीक गाळ शेतात वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. तसेच परिसरातील पाणीटंचाई कमी होऊन पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
सध्या कोळगाव येथील जुनीवाडी, वेठेकरवाडी, कोथूळ व चिखली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम चालू आहे. त्यासाठी पोकलेन, हायवा व ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राह फाउंडेशनच्या वतीने मशनरी वापरून गाळ भरून दिला जात आहे. शेतकरी स्वतःच्या वाहनाने हा गाळ आपल्या शेतात घेऊन जात आहे, अशी माहिती बंडू कवडे यांनी दिली.
या कामाच्या प्रारभ कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, कोथूळ सोसायटीचे चेअरमन धनंजय लाटे, तसेच चिखलीचे सरपंच कुलदीप कदम व मार्केट कमिटीचे संचालक रामदास झेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पाणीसाठा वाढविण्याचे उद्दिष्ट
गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी लोकसहभागातून मोलाचे योगदान देत आहे. राह फाउंडेशनतर्फे यापूर्वीही अनेक समाजपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. यावर्षी पारनेर व आसपासच्या गावांमध्ये सुमारे 100 कोटी लिटर पाणीसाठा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात नगर जिल्ह्यात एकूण 300 कोटी लिटर पाणीसाठा वाढविण्याचे काम पूर्ण केले, अशी माहिती राह फाउंडेशनचे प्रादेशिक प्रमुख अमोल बारंगुळे यांनी दिली.