नगर : आखाती देशांतील युध्दाची झळ इंधनाबरोबरच अंजीर, खजूर आदी ड्रायफ्रूटला बसली आहे. युध्दामुळे होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्यामुळे इराण व आफगाणिस्थानातून होणारी अंजीर आणि खजूरची आवक बंद आहे. त्यामुळे ऐन रमजानमध्ये अंजीर व खजूर आदीच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका मुस्लिम समाजातील गोरगरिब जनतेला बसला आहे. दरम्यान, नागरिकांची तसेच व्यावसायधारकांची सिलिंडरसाठी वणवण सुरुच आहे.
युध्दजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा कमी झाल्याने व्यावसायिक वापरातील सिलिंडरचा पुरवठाच जवळपास बंद झाला. त्यामुळे हॉटेल, खानावळी तसेच रेस्टॉरंटचालकांची सिलिंडरसाठी वणवण सुरु आहे. मिळेल तेथून सिलिंडर चढ्या भावाने खरेदी केलेजात आहे. जोडीला इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करुन व्यवसाय सुरु ठेवला आहे. टंचाई अधिक दिवस चालली तर खानावळीदेखील बंद होण्याची शक्यता वाढली आहे. याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी व नोकरदारांना बसणार आहे.
शासनाने घरगुती गॅस सिलिंडरला प्राधान्य दिले आहे. सध्या घरगुती सिलिंडरचा तुटवडा नाही. नियमानुसार सिलिंडर वाटप सुरु असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. अशा परिस्थितीत कामधंदा सोडून नागरिकांच्या गॅस एजन्सींपुढे उन्हातान्हात रांगा सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.
सध्या रमजान सुरु आहे. मुस्लिम समाजाचे उपवासाचे दिवस सुरु आहेत. उपवास सोडण्यासाठी खजूर, अंजीर आदी ड्रायफ्रूट आवश्यक असल्याने मागणी वाढली आहे. परंतु युध्दजन्य परिस्थितीमुळे अंजीर, खजूर आदीची नवीन आवक नसल्याने उपलब्ध ड्रायफ्रटला मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच दर वाढले आहेत. एक हजार रुपये किमतीचे अंजीर आता अकराशे रुपयांना मिळत आहेत. तेराशे रुपये किलो अंजीर आता चौदाशे ते साडेचौदाशे दराने विकले जात असल्याचे अहिल्यानगर येथील ड्रायफ्रटचे डिलर आदित्य भंडारी यांनी सांगितले. खजूर किमतीत देखील पेटीमागे 50 ते शंभर रुपये दर वाढल्याचे तारकपूर येथील सचिन एजन्सीचालकाने म्हटले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरबाबत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शुक्रवारी (दि. 13) पेट्रोलियम कंपनीचे सेल्स प्रतिनिधी, गॅस एजन्सीचालक, तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपलब्ध साठा आणि वाटप आदींचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीत उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार सिलिंडर वाटपाचे नियोजन ठरण्याची शक्यता आहे.