राहुरी: देशामध्ये विरोधी पक्षाने महिला आरक्षणाला विरोध करून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समाजसुधारणा विचारांना तिलांजली वाहिली आहे. सत्तेच्या माध्यमातून विकासात्मक योजना बंद पडू दिल्या जाणार नाहीत. समुद्रात वाहून जाणारे 25 टीएमसी पाणी नगर-नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये आणून राज्य दुष्काळमुक्तीचा चंग बांधलेला आहे. मुळा धरणात लवकरच गाळउपसा करून 3 टीएसमी पाणीसाठा वाढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत दिले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सर्व आमदार संग्राम जगताप, प्रसाद लाड, मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, अमोल खताळ; माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तसेच अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, अक्षय कर्डिले, विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, ॲड. सुभाष पाटील, दिलीप भालसिंग, नगराध्यक्ष सत्यजित कदम, अनिल मोहिते, सुरेंद्र थोरात, नगरसेवक हर्ष तनपुरे, नामदेव ढोकणे, काशिनाथ लवांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक प्रकल्पावर काम सुरू आहे. समुद्राला वाहून जाणारे 25 टीएमसी पाणी वळवून ते नाशिक, नगर व मराठवाड्याला देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अतिरिक्त एक हजार एकर जागेवर प्रकल्प निर्मितीसाठी पालकमंत्री विखे यांनी दिलेली मौल्यवान सूचना लक्षात घेऊन नवीन औद्योगिक प्रकल्प आणत तरुणांच्या हाताला काम देऊ. संरक्षण प्रकल्प निर्मिती होऊन 35 हजार तरुणांना रोजगार देऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विरोधकांमुळे महिला आरक्षण कायदा पराभूत
अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगाम होण्यापूर्वीच कर्जमाफी झालेली असेल. नियमित कर्जमाफी करणाऱ्यांनाही लाभ देऊ, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महिलांना आरक्षण देण्यासाठी लोकसभेत नव्याने कायदा आणला होता. प्रत्येक राज्यामध्ये खासदारांच्या जागा वाढवत त्यामध्ये 33 महिलांना संधी मिळणार होती. परंतु विरोधी पक्षाने महिला आरक्षणाला विरोध केला. विरोधी पक्षांच्या चुकीच्या भूमिकेने महिला आरक्षण कायदा पराभूत ठरला. त्यामुळे विरोधकांना जनतेने चांगला धडा शिकवावा.
काका आले; पुतण्या मागेच
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवेळी स्टेजवर दिसणार, अशी चर्चा केली जात होती; परंतु प्राजक्त तनपुरे हे स्टेजवर दिसले नाहीत; परंतु त्यांचे काका तथा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व नगरसेवक हर्ष तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत थेट स्टेजवर हजेरी लावली. पुतणे प्राजक्त तनपुरे मात्र मागेच राहिल्याची चर्चा या वेळी होत होती. राज्याच्या राजकारणात सर्वत्र काका-पुतणे नेहमीच चर्चेचा विषय असल्याने राहुरीतील या काका-पुतण्यांबाबही चर्चा रंगली आहे. काका आज आले; पुतण्या मागून येणार असल्याचेही बोलले जात होते.
मी माझा पक्ष सोडलेला नाही. उमेदवारी माघारीची भूमिका केवळ निवडणुकीपुरती असून मी आजही आहे तिथेच आहे. राज्यात विरोधी पक्षांची स्थिती कमकुवत झाली आहे. कोट्यवधींची विकासकामे करूनही जनतेचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. तरीही राजकीय तत्त्वे महत्त्वाची आहेत आणि त्यावरच मी ठाम आहे.प्राजक्त तनपुरे