राहुरी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज (शनिवार) दुपारी 3 वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, बाजार समिती आणि साखर कारखान्याचे संचालक सकाळीच मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान, या प्रवेश सोहळ्यानंतर लगेच परत येऊन सोमवारी (दि. 1) प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची राहुरीतील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि लगोलग राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचे तनपुरे यांनी ठरविले, तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तनपुरे यांनी आता भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी दुपारी त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. आता राहुरीला अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे असे दोन आमदार लाभणार असल्याने कार्यकर्ते प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळेच तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाकडे केवळ पक्षांतर म्हणून नव्हे, तर भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण तनपुरे हे केवळ राहुरीतील प्रभावी नेते नसून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजपची वाट धरली आहे.
अशातच आता प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश हा उत्तर महाराष्ट्रातील राजकारणासाठी निर्णायक मानला जात आहे. राहुरी तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवरील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजपला ग्रामीण भागात मोठी ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे राहुरी मतदारसंघातील आगामी राजकारण पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.