दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण खपाटीला गेले असून, रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडेच चालल्याने बळिराजापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अजून आठ-दहा दिवसांत पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावणार असून, सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहेत.
यंदा उष्णतेने कहर केला असताना निम्मा जून संपला असतानाही उष्णता अजूनही कमी झाली नसल्याने पाण्याबरोबर चाऱ्याची टंचाई समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जूनचा पंधरवडा संपून गेला, तरी पावसाने दडी मारल्याने मुगासह खरीप पेरणी होते की नाही याची चिंता बळिराजाला लागली आहे. पाणी व चाराअभावी दुग्ध व्यवसायही संकटात सापडला आहे.
पारनेर तालुक्यातील एकमेव असलेले मांडओहळ धरणाने तळ गाठला असून, यावर्षी अतिउष्णता असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले असून, सरकारने पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. दरम्यान, मांडओहळ खोऱ्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटो, मिरची यांसारख्या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, पाणीसाठा आरक्षित केल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्ग पुन्हा हिरावून नेतो की काय अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याची खंत मांडओहळ खोऱ्यातील टोमॅटो उत्पादक लहू गेणू वाळुंज यांनी व्यक्त केली.
मान्सून का अडखळला?
हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्रात ओलाव्याची कमतरता नाही. मात्र, वातावरणाच्या वरच्या स्तरावरील वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलामुळे मान्सूनची यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी मान्सून महाराष्ट्रात दाखल जरी झाला असला, तरी अपेक्षित पाऊस पडत नाही.
आजमितीस मांडओहळ ३९९ पैकी ४३, काळू मध्यम प्रकल्प २९९ पैकी ८३ दशलक्ष घनफूट असून, भाळवणी, तिखोल, ढोकी नं.१, ढोकी नं.२, पळशी, मांडवे धरण कोरडेठाक पडले आहे.विशाल तांबे, शाखा अभियंता, मांडओहळ
खरिपापूर्वीची मशागत पूर्ण झाली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरिपापूर्वी मोठे भांडवल गुंतवून खरिपाचे सर्व बियाणे व खते उपलब्ध केली असून, पावसाअभावी बियाण्यांसह सर्व खते पडून असल्याने धंदा अडचणीत सापडल्याचे विदारक चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहेत.विशाल ढेंबरे, कृषी दुकानदार, टाकळी ढोकेश्वर