

नगर: पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा सुरू होत असून, यामुळे साईभक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी या नव्या रेल्वेसेवेचे स्वागत केले.
पुणे येथे बुधवारी (१७ जून) उद्घाटन करण्यात आलेल्या या रेल्वेसेवेबद्दल डॉ. विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ते म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
पुण्याहून मिळालेल्या या पहिल्या थेट रेल्वे सुविधेमुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षांत रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले असून नवीन रेल्वेमार्ग, आधुनिक स्थानके, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या आणि प्रवाशांसाठी वाढलेल्या सुविधा यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत आहे. पुणे–शिर्डीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर थेट रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यामागे केंद्र सरकारची विकासाभिमुख भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही रेल्वे पुणे, अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर मार्गे शिर्डीपर्यंत दररोज धावणार आहे. त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे ता अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी अधिक सुलभ होणार आहे, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.