भावाअभावी कांद्यावर नांगर फिरवण्याची वेळ; अतिवृष्टीने अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान file photo
अहिल्यानगर

Onion crop loss Ahilyanagar: भावाअभावी कांद्यावर नांगर फिरवण्याची वेळ; अतिवृष्टीने अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

वखारीतील कांद्याला मोड, बाजारभाव कोसळला; ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळली, रोगांचे संकट वाढले

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका : कांदा पिकावर शेतकरी, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असते. कांदा उत्पादन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत आहे. लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून असते. परंतु हवामानातील अनियमितता, पावसाचा तडाखा, साठवणुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचे पीक नष्ट होताना पहावे लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे. अहिल्यानगर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे.  (Latest Ahilyanagar News)

अहिल्यानगर तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते कांदा पिकावरच अवलंबून असते. डोंगराळ, पाण्याचा निचरा होणारी जमीन त्यामुळे तालुक्यातील लाल कांदा, तसेच गावरान कांद्याचे उत्पादन व गुणवत्ता चांगली असते. त्यामुळे तालुक्यातील कांद्याला विविध राज्यांतून मोठी मागणी असते. अनेक परराज्यातील कांदा व्यापारी अहिल्यानगर तालुक्यात स्थायिक झाले असून, येथून परराज्यात कांद्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात केला जातो. नगर तालुक्यातूनच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा खरेदी केली जाते.

चालू वर्षी कांदाउत्पादक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. अतिवृष्टीने नव्याने लागवड केलेल्या कांद्याचे, तसेच वखारीत ठेवलेला कांदा भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाजारात कांद्याला एक हजार रुपये ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. वखारीत ठेवलेला गावरान कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना मोड येऊ लागले आहेत. वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आजच्या भावात कांदा विकावा, तर झालेला खर्चही वसूल होणार नाही अन्‌‍ वखारीत ठेवावा तर कांदा खराब होत आहे, अशा दुहेरी संकटात बळिराजा सापडला आहे.

तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नव्याने लागवड करण्यात आलेल्या लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. विविध महागड्या औषधांची फवारणी, तसेच खतांचा वापर करूनही कांदा पिकामध्ये सुधारणा होत नाही. त्यातच कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या तालुक्यातच कांदाउत्पादक शेतकऱांची दयनीय अवस्था झाली आहे.

जेऊर पट्टा कांदा उत्पादनासाठी तालुक्यात अग्रेसर असतो. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, चापेवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गड, जेऊर या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. परंतु गडगडलेले बाजारभाव, अतिवृष्टीचा बसलेला फटका यामुळे कांदाउत्पादकांची चिंता वाढली आहे. अतिवृष्टीमुळे नव्याने लागवड करण्यात आलेला लाल कांदा फक्त हिरवेगार दिसत असून, आवश्यकतेनुसार वाढ व कांदा पोसण्याची क्षमता होत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी वैतागून उभ्या कांद्याच्या पिकात नांगर फिरवला आहे. मोठा खर्च करून लागवड करण्यात आलेले कांदा पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.

अतिवृष्टी व कांदा पिकाला भाव नसल्याने त्याचा परिणाम दिवाळी सणावर तसेच बाजारपेठेत दिसून आला. भावाअभावी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा शेतात फेकून दिला आहे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला आहे. त्यामुळे लाल कांदा पीक मर, बुरशी, मावा, तुडतुडे, करपा, डाऊनी अशा विविध रोगांना बळी पडले आहेत. महागडी औषधांची फवारणी करूनही कांदा पिकात सुधारणा होत नाही.

एक एकर लाल कांद्याची लागवड केली होती. बियाणे, रोप, मशागत, लागवड, औषधांची फवारणी यासाठी सुमारे 80 ते 90 हजार रुपये खर्च आला. परंतु वातावरणातील बदल व अतिवृष्टीमुळे कांदा विविध रोगांना बळी पडला. खर्च करूनही बाजारभाव नसल्याने उत्पन्न हाती येणार नाही. त्यामुळे वैतागून पिकात नांगर घालून कांदा पीक मोडून टाकले.
हेमंत शेटे, शेतकरी, जेऊर
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तसेच इतर राज्यांनी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे इतर राज्यांतील मागणी घटली. शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत गावरान कांदा वखारीत ठेवला आहे. तोही खराब होण्यास सुरुवात झाली आहे. लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
अक्षय कटारिया, कांदा व्यापारी
गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल झालेला दिसून येतो. ढगाळ हवामान व तुरळक पाऊस यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, तसेच कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. काही समस्या असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
सुरेखा घोंडगे, सहा. कृषी अधिकारी, कृषी विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT