नेवासा: तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकाऱ्यासह शालेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखासह लिपिकांची पदे रिक्त असल्याने १५ जून रोजी सुरू झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे कामकाज कोण पाहणार असा सवाल पालकांतून व्यक्त होत असून, शिक्षण विभाग अधिकाऱ्यांविना व्हेंटिलेटरवर असल्याने त्वरित अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी पालकांनी केली आहे.
तालुक्यात २५३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षास १५पासून सुरुवात झाली आहे. पुस्तक वाटप, मोफत गणवेश, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत या सर्व कामाच्या जबाबदाऱ्या ज्यांच्यावर आहे असे गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, तसेच विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यातच प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर हे ३० रोजी निवृत्त होणार आहेत.
त्यामुळे एका विस्ताराधिकाऱ्यावरच अतिरिक्त ताण सध्या आल्याने त्याचा शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. शिक्षण विभाग विविध योजना हे समीकरण ठरलेले आहे. अनेक राज्य स्तरावरील, विभाग स्तरावरील उपक्रम राबविले जातात. शिवाय जिल्हा परिषदेतर्फे मिशन आरंभ, शिष्यवृत्तीबाबत तयारी आणि अन्य उपक्रमही असतात. शाळांची गुणवत्ता पाहणेही महत्त्वाचे असते. पडताळणी करण्यासाठी विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यासाठी अधिकारी आवश्यक आहेत. हे अधिकारीच तालुका शिक्षण विभागात सध्या नाही त्यामुळे हा विभाग अधिकारीविना बेवारस झाला आहे. त्यामुळे सर्व पदे त्वरित भरण्याची मागणी अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख यांनी केली आहे.
गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता
नेवासा तालुक्यात गटशिक्षण अधिकाऱ्यासह शालेय पोषण आहार अधीक्षक व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर केंद्रप्रमुखावर व कार्यरत असलेल्या एकाच विस्तार अधिकाऱ्यावर येत असल्याने त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दृष्टिक्षेपात तालुका:
एकूण शाळा २५३
गटशिक्षणाधिकारी १- रिक्त १
शालेय पोषण आहार अधीक्षक १ - रिक्त १
विस्ताराधिकारी मंजूर ४ - रिक्त ३
केंद्रप्रमुख मंजूर १९ - रिक्त ८
लिपिक मंजूर ४ - रिक्त २
शासन एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा मारत असताना तालुक्यात मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त आहेत. एकाच विस्तार अधिकाऱ्यावर संपूर्ण कामकाजाचा भार आल्याने तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. त्वरित अधिकाऱ्यांची पदे भरावेत; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार.शरद अरगडे, सरपंच, सौंदाळा