संगमनेर: नाशिक-पुणे सरळ मार्गी रेल्वे व्हावी, याकरीता नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, अकोले, जुन्नर, खेड या तालुक्यांमध्ये नागरिकांमध्ये एकजूट झाली आहे. सरळ रेल्वे मार्गाकरीता आ. सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनात तरुणाई एकवटली आहे. या सरळ मार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर सकाळी आंदोलन केले जाणार आहे.
नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गे व्हावी, याकरीता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर सातत्याने केंद्रीय मंत्री महाराष्ट्र सरकार, महारेल व रेल्वे यांच्या समवेत पाठपुरावा करून विविध बैठका घेऊन हा रेल्वेमार्ग अंतिम स्तरावर पोहोचवला. २०१९ मध्ये सरळ रेल्वे मार्गाकरीता आरक्षण होऊन शेतकऱ्यांना सुमारे ६०० कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. पुण्यावरून पुणतांबा, असा झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे, याकरीता बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांनी लढा सुरू केला.
केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, महारेल यांच्याकडे पाठपुरावा सुरू झाला. मात्र हा रेल्वे मार्ग नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे, असा करण्यात आल्यामुळे सरळ रेल्वे मार्ग होणार की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या विभागाच्या विकासाकरीता हा रेल्वेमार्ग अत्यंत गरजेचा असून तो झालाच पाहिजे, या करीता आ. सत्यजित तांबे यांनी या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. प्रत्येक तालुक्यातील तरुणाई एकत्र केली.
याचबरोबर सरळ रेल्वे मार्गाकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, खा. राजाभाऊ वाजे, आ. शरद सोनवणे, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. बाबाजी काळे, आ. विलास लांडे, आ. महेश लांडगे, माजी मंत्री आ. माणिकराव कोकाटे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी पाठिंबा दिला आणि ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आता केंद्र सरकार व महाराष्ट्राचे सरकारचे लक्ष वेधण्याकरीता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. ९) क्रांतिदिनी सकाळी सर्वत्र एकाच वेळी रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील जनता सहभागी होणार असून संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगाव पावसा टोल नाका येथे हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाबाबत सोशल मीडिया मधून तरुणांनी जागृती केली आहे. याचबरोबर गावोगावी नागरिक एकत्र येऊन रेल्वे झालीच पाहिजे, अशी मागणी करत आहेत. यामध्ये जेन-झी सुद्धा सरसवली आहे. या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.