अहिल्यानगर

Ahilyanagar News : नगरची 'वैष्णवी'ही घरात असुरक्षित? ९०५ विनयभंग, ५१५ छळ, आठ जणी ठरल्या हुंडाबळी

जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत असताना महिलांची सुरक्षाही चिंतेचा विषय बनली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nagar's 'Vaishnavi' is also unsafe at home? 905 molestations, 515 harassments, eight dowry victims

गोरक्ष शेजूळ

नगर : जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत असताना महिलांची सुरक्षाही चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या दीड वर्षात नगरमध्येही ९०५ मुली, विवाहितांचा विनयभंग झाला आहे, ५१५ विवाहितांचा सासरी छळ झाला आहे, तर निरपराध ३७ विवाहितांना पती, सासू, सासरे, नणंद यांनी वारंवार त्रास देऊन अक्षरशः आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुढे आले आहे.

दुर्दैवाने अशाच छळातून पुण्यातील 'वैष्णवी प्रमाणे नगरमध्येही ८ विवाहितांचा 'हुंडाबळी' गेल्याच्या हृदय हेलावणाऱ्या घटना घडल्या. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदलले असले तरी नगरची 'वैष्णवी ही स्वतःच्या घरात, कुटुंबातही असुरक्षित असल्याचे आकडे बोलत आहेत.

अहिल्यानगरमध्ये जानेवारी २०२४ ते मे २०२५ या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये महिलांच्या छळाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात शेतीचे वाद, शेजारील भांडण, भावबंदकीतील हाणामाऱ्या, आर्थिक देवाणघेवाण, एकतर्फी प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून महिलांचा विनयभंग घडल्याचे गुन्हेही पोलिसात दाखल आहेत. अशाप्रकारे ४९० दिवसांत तब्बल ९०५ महिलांचा, मुलींचा विनयभंग झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शेजारी, भावकीतील आरोपी अधिक आहेत.

'त्या' निरपराध आठ विवाहितांचा मृत्यू

सासरच्या छळाला कंटाळून आठ विवाहितांनी आत्महत्या केल्याचे दीड वर्षात पुढे आले आहे. याप्रकरणात माहेरच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे व इतर जबाबदार नातेवाइकांवर वेगवेगळ्या ठाण्यात हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या सक्त सूचना

अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पहिल्याच बैठकीत महिलांशी संबंधित गुनग्रांसंदर्भात तत्काळ तक्रार घेऊन तपास करण्याबाबत सर्वच 'ठाणेदारां'ना सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात निश्चितच महिलांमध्ये सुरक्षेची भावना तयार होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

घरगुती कारणांतूनही सासरी छळ

घरगुती किरकोळ कारणातूनही विवाहितेच्या छळाचे प्रमाणही चिंता वाढविणारे आहे. ५१५ विवाहितांना सासरच्या लोकांकडून स्वयंपाक येत नाही, चांगली नांदत नाही, मूल होत नाही, चांगली दिसत नाही, रंगाने काळी आहे, ऐकत नाही, अशा वेगवेगळ्या कारणातून पती, सासू, सासरा, नणंद आदींकडून छळ केला जात होता. याप्रकरणीही ५१५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३७ विवाहितांवर आत्महत्येची वेळ

प्लॉट, फ्लॅट, गाडी घेण्याकरिता, व्यवसायासाठी, लग्नातील हुंड्यापोटी, दागिने, भांडे, अशा मागण्यांसाठी सासरकडून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याची किंवा मारहाण करून तिला गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण केल्याचे प्रकरणेही दिसले. अशा प्रकरणात नातेवाइकांच्या फिर्यादीवरून गुन्हेही दाखल आहेत. जिल्ह्यात दीड वर्षात ३७ महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT