नगर तालुका: नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपसा तत्काळ बंद करा, तसेच पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा. उन्हाळ्यात परिसरातील गावांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत असते. त्यामुळे तत्काळ तलावातील अवैध पाणी उपसा बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जेऊर ग्रामपंचायतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच जेऊर ग्रामसभेत तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव घेण्यात आला होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातून अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
शुक्रवारी (दि.23) जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना पिंपळगाव माळवी तलावातील पाणीसाठ्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. तलावामधून बेसुमार अवैध पाणीउपसा होत असून तो तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. पिंपळगाव माळवी तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी जेऊर, डोंगरगण, धनगरवाडी, मांजरसुंबा या गावांना जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून या गावांना पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु सद्यस्थितीत तलावामधून मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा सुरू आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असतो. दरवर्षी तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी करावी लागते. अनेक शेतकरी तलावातून जलवाहिन्या टाकून पाणी उपसा करीत असल्याची ही माहिती स्थानिकांंकडून मिळाली.
उन्हाळ्यात परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते. पिंपळगाव माळवी तलावात पाणी असल्यास परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळतो. परंतु तलावातील बेसुमार पाणी उपशामुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपसा बंद करावा. तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जेऊर, धनगरवाडी परिसरातून करण्यात आली आहे.
कारवाई करण्याची मागणी
अनेक वर्षांपासून पिंपळगाव माळवी तलावातून जेऊर सह परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपशामुळे उन्हाळ्यात जेऊर परिसरातील वाड्या वस्त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती होते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी जेऊर ग्रामस्थांमधून होत आहे.