Onion Farmers Crisis Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Onion Farmers Crisis: नगर तालुक्यात कांदा साठवणीची धावपळ; उन्हाच्या तडाख्यात शेतकरी त्रस्त

हजार ते बाराशे रुपये क्विंटल भाव; चांगल्या दराच्या अपेक्षेवर कांदा चाळीत साठवणूक सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: उष्णतेचा पारा चढत असताना सर्वसामान्य नागरिक सावलीचा आसरा घेताना पाहावयास मिळतात. पण गाव कुसाबाहेरच्या शिवारात ग्रामीण भागात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. माथ्यावर आग ओकणारा सूर्य आणि त्याखाली कांद्याच्या ढिगात राबणारा बळीराजा. मोठ्या मेहनतीने पिकविलेला कांदा वखारीत टाकण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याची लगबग सुरू आहे.

शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी कडक उन्हाक राबताना दिसून येत आहे. उष्माघाताचा धोका तसेच घामाने अंगचिंब भिजत असले, तरी शेतकऱ्याचे हात मात्र थांबत नाहीत. कांद्याचे ढीग नीट पसरवणे, कांद्याची प्रतवारीनुसार निवड करणे, गोण्यात भरणे व कांदा साठवणुकीसाठी वखारीत टाकण्यासाठी शेतकरी कुटुंबीयांसह मैदानात उतरला आहे. कोठे महिला कांदा वेचताना दिसतात, तर लहान लेकरे गोण्या धरून उभे तर वृद्ध पशुधन सांभाळून शेतात फेरफटका मारताना दिसून येतात.

नगर तालुका हा कांद्याचे पठार म्हणून उदयास आला आहे. कांदा पिकावरच शेतकऱ्यांचे वार्षिक गणित अवलंबून असते. कांदा पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच मुलांच्या शिक्षणाची फी, घरातील किराणा, कर्जाचे हप्ते आणि वर्षभराचा खर्च अवलंबून असतो. म्हणूनच उन्हाच्या प्रखरतेतही कांदा वाचवणे बळीराजासाठी जीवा पेक्षा महत्त्वाचे ठरत आहे.

कांदा चाळीत टाकण्यासाठी गावोगावी लगबग सुरू आहे. कांद्याला हवा खेळती राहील, अशा पद्धतीने साठवणूक करत आहे. निसर्गाचा फटका, बाजाराचा धक्का अन्‌‍ मजुरीचा वाढलेला खर्च, साठवणुकीची धावपळ यामध्ये बळीराजा अक्षरशा होरपळत आहे. उन्हाने धरती भाजली तरी आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा बळीराजाला आहे.

सद्यस्थितीत कांद्याला हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या भावात कांदा विक्री केल्यास झालेला खर्च देखील वसूल होत नाही. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर बळीराजा उन्हाची तमा न बाळगता कांदा वखारीत साठवण्यास मग्न झाला आहे.

सुमारे दोन एकर गावरान कांद्याची लागवड केली. त्यासाठी एक लाख रुपयांवर खर्च आला. उत्पन्नही चांगल्या प्रमाणात निघाले आहे. परंतु बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. कांदा चाळीत टाकण्याचे काम सुरू आहे. चाळीत मध्ये असलेला कांदा सडण्याची शक्यता असते. तसेच वजनातही मोठी घट होते. भाव वाढ झाली नाही तर शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार आहे.
बाळासाहेब देशमुख, शेतकरी, जेऊर
शेतकऱ्यांनी कांद्याची गुणवत्ता पाहून कांदा टिकणार असेल, तर चाळीत ठेवावा. जुलै-ऑगस्ट मध्ये फायदा होऊ शकतो. कांद्याचे बाजारभाव कोसळलेले असल्यामुळे बांधावरील खरेदी मंदावली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र हे कांदा पिकावरच अवलंबून असते. बहुतांशी शेतकरी कांदा चाळीमध्ये साठवणूक करण्यात व्यस्त आहेत.
अक्षय कटारिया, कांदा व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT