सोनई: मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत एकहाती सत्ता कायम राखली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकणाऱ्या गडाख पॅनलने उर्वरित चार जागांवरही सुमारे सहा हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व जागांवर लढत देण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पॅनलला प्रत्यक्षात केवळ चार जागांवरच निवडणूक लढवावी लागली. या चारही जागांवर मतदारांनी गडाख पॅनलवर एकतर्फी विश्वास दाखवत विरोधकांना स्पष्ट नाकारले. करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक (६८९५) आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६७२५) यांनी दणदणीत विजय मिळविला. विरोधी उमेदवार नारायण डौले (८४७) व किरण जाधव (१०४१) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. महिला राखीव मतदारसंघातून कमल चांगदेव दहिफळे (७४०१) आणि विमल नारायण सोनवणे (७१८२) विजयी झाल्या, तर विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना केवळ १००० मते मिळाली.
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कासार पिंपळगाव गटातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांच्या गटाने अपेक्षेप्रमाणे दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता अधिक भक्कम केली. कारखान्याच्या १९ पैकी १७ जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकलेल्या राजळे गटाने उर्वरित दोन्ही जागाही जिंकत संचालक मंडळावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. अप्पासाहेब राजळे व उध्दव वाघ यांच्या विरोधात लढत दिलेल्या शिवशंकर राजळे यांना मिळालेली १६४२ मते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
कासार पिंपळगाव गटातून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, संचालक उद्धव वाघ आणि शिवशंकर राजळे यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यामध्ये आप्पासाहेब राजळे यांनी ४९३२ मते मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर उद्धव वाघ यांना ४१५८ मते मिळाली. मतमोजणीत ६७ मते अवैध ठरली.
एका मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असतानाही अनेक मतदारांनी केवळ एका उमेदवारालाच मत दिल्याचे अनेक मतपत्रिकांवर दिसून आले. या निवडणुकीतील तिन्ही उमेदवार एकमेकांचे निकटचे नातेवाईक असल्याने या लढतीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवशंकर राजळे यांनी एकहाती लढत देत अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळविल्याने विरोधी गटात समाधानाचे वातावरण होते.
आ. राजळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. पाथर्डी शहरातील नाईक चौकात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन वायकर, प्रतीक नांगरे, बबलू खोर्दे, सागर पाथरकर, बबन बुचकुल आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सभासदांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. अनेक वर्षांनंतर निवडणूक झाली. त्यामुळे सभासदांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ सभासदांच्या मार्गदर्शनातून भविष्यात त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल.मोनिका राजळे, आमदार
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई होती. मला पाचशे मतेही मिळणार नाहीत, असा दावा करणाऱ्यांना मतदारांनी उत्तर देताना १६४२ मते देत विश्वास दाखवला आहे. प्रचंड आर्थिक ताकद वापरूनही मला रोखता आले नाही. भविष्यातही सभासदांच्या प्रश्नांसाठी माझा संघर्ष सुरूच राहील.शिवशंकर राजळे