राहुरी: मुळा धरण पाणलोटात गत आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने अंबित, पिंपळगाव खांड धरण ओसंडून वाहत आहे. मुळा धरणाच्या दिशेने झेपावलेल्या पाण्याने नव्या आवकेचा श्रीगणेशा झाला. सायंकाळी सुमारे अडीच हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक धरणात होत असल्याची नोंद मोजपट्टीवर झाली.
शनिवारी (दि. ४ जुलै) पहाटेपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून नवीन पाणी दाखल होण्यास सुरुवात झाली. लहीत खुर्द (कोतुळ) येथील मुळा नदीच्या आवक मोजपट्टीवर सकाळी सुमारे १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी येत असल्याचे दिसून आले. दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवक वाढून २ हजार ४४१ क्युसेकवर पोहचली.
पावसाचा जोर कायम राहिल्यास मुळा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून, खरीप व रब्बी हंगामासह आगामी ऊस हंगामासाठीही ही बाब दिलासादायक ठरणार आहे. नव्या पाण्याच्या आवकेने दक्षिण नगर जिल्ह्याच्या जलसुरक्षेला नवसंजीवनी मिळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यंदा 'अल निनो'च्या संभाव्य परिणामांमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यातच जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच धरणाकडे नव्या पाण्याची आवक सुरू झाल्याने शेतकरी, नागरिक आणि उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
८.६८ टक्के जलसाठा
सध्या मुळा धरणात ६ हजार ३६७ दलघफू जलसाठा असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १ हजार ८६७ दलघफू म्हणजेच केवळ ८.६८ टक्के इतका आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील उपयुक्त साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभीच नव्या पाण्याची आवक सुरू झाल्याने आगामी काळात जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतुळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सायंकाळपर्यंत पावसाचा वेग काहीसा मंदावला. धरणात नव्याने पाणी दाखल झाले आहे.सायली पाटील, कार्यकारी अभियंता