Kopargaon Politics Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Politics: मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितले.. कमळ म्हणजे कमळच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कोल्हेंचा विश्वासनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच माजी आमदार स्नेहलता कोल्हे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात शाब्दिक द्वंद झाले. मात्र मंत्री विखे पाटील यांनी स्नेहलता यांचा भाची म्हणून उल्लेख करताना ‌‘शंका घेऊ नका, चिंता करू नका; निवडणूक आपणच जिंकणार आहोत,‌’ असा शब्द दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर ‌‘मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितले, कमळ म्हणजे कमळच. आता शंका कुशंका संपल्या आहेत‌’, अशी कोटी करत विवेक कोल्हे यांनी मांडलेला विश्वासनामा पूर्ण करण्याची जबाबादरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. दोन तारखेला चुकलात तर पाच वर्षे भोगावे लागेल. ‌‘पराग‌’चं विकासासोबत संधान घालण्यासाठी आलो आहे. पुढची पाच वर्षे जबाबदारी आमची आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपरगावकरांना साद घातली.

कोपरगाव नगरपालिकेतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व नगरसेवकांच्या प्रचारार्थ सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार विक्रमसिंह पाचपुते, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

गोदाकाठच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण भिंत मंजूर करण्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे केली. कोपरगाव शहराच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करतानाच कोपरगावची जनता सुज्ञ असल्याचे त्यांनी नमूद केले.

मला आका म्हणा, काही म्हणा..: विखे

पालकमंत्री विखे पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यासोबतच कोपरगावच्या राजकारणाबद्दल भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कोपरगावच्या धकाधकीच्या राजकारणात आपला भाजपचा उमेदवार फक्त संधान आहे. त्यामुळे याबाबत मनात शंका ठेवण्याचे कोणतेच कारण नाही. निवडणुकांना स्वच्छ अंतःकरणाने सामोरे गेले पाहिजे. किंतु परंतु ठेवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, काही वाटत नाही. मात्र आकाच्या मनात आले तर काही होवू शकते, हे सुद्धा करून दाखवू शकतो. वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवले पाहिजे. कोणाला आका, काका, बाका म्हणायचे, याला मर्यादा पाहिजे. निवडणुकीत यश पाहिजे असेल तर मनावर संयम ठेवला पाहिजे. संयमाने यश मिळते, उतावळेपणाने नाही, अशा कानपिचक्या मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

स्नेहलता कोल्हे आणि विखे पाटील यांच्या भाषणातील जुगलबंदीवर भाष्य करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाचे व्हिजनही मांडले. तीन तास उशीर झाला तरी तुम्ही शांत बसला आहात. सभेची गर्दी पाहता भाजपला आशीर्वाद देण्याचा निर्णय कोपरगावकरांनी घेतला आहे. परागचे विकासाशी संधान घालून देण्यासाठी आलो आहोत. निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणार नाही. राज्यातील नागरी भागाला विकसित कसे करायचे याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. तो आराखडा पूर्ण करण्याकरिता निधीची चिंता करण्याची गरच नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी आहेत. विवेक कोल्हे यांनी जाहीर केेलेला भाजपचा जाहीरनामा नाही तर विश्वासनामा आहे. विवेकने जो विश्वासनामा मांडला तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून तो पूर्ण करून दाखवू. साईनगरमधील 660 अतिक्रमणे निघाली, पुनवर्सन झाले नसल्याचे स्नेहतला कोल्हे यांनी सांगितले. पण नगरपालिकेत सरकार आले की त्यांचे त्यांचे पुनवर्सन करून पक्की घरी दिली जातील. मी, तसेच मंत्री विखे पाटील, महाजन हे सगळे कोल्हे यांच्या पाठिशी उभे आहोत. त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. गत विधानसभेला स्नेहलता कोल्हे यांना पाचशे मतांनी पराभूत केले. गत नगरपालिकेला पॅनल निवडून दिला, पण नगराध्यक्ष नाही. आता असे करू नका, सगळीकडे कमळ पाहा. सगळ्यांना सोबत घेत विजय मिळवायचा आहे. 2 तारखेला तुम्ही लक्ष द्या, त्यानंतरची पाच वर्षे लक्ष देण्याची जबाबदारी आमची, असे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या विजयाची साद कोपरगावकरांना घातली. विजयी सभेला कोपरगावात पुन्हा येण्याचेही त्यांनी जाहीर केले.

विखे-कोल्हे जुगलबंदी

कोणाला किती पाठीशी घालायचे हे ठरवा ः कोल्हे

प्रारंभी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ‌‘पालकमंत्री आले, याचाही आनंद झाला आणि त्यांची मोठी मदत लागणार आहे,‌’ असे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत, त्या म्हणाल्या, समोरच्या उमेदवाराने- ‌‘आताच लोणीच्या कार्यक्रमातून आलो; पण आपला जसा कार्यक्रम झाला, तसा तो झाला नाही. विवेक भैय्याची दृष्ट काढा,‌’ असे फोन करून सांगितले. आजही तो संदेश माझ्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचे हे ठरवा. माणसं अशी दलबदलू असतात, असा सल्ला विखे पाटील यांना दिला!

भाचीला शंका घेण्याचे कारण नाही ः विखे

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोपरगावचा नगराध्यक्ष भाजपचाच निवडून येईल, असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले. स्नेहलता कोल्हे यांचा भाची म्हणून उल्लेख करताना ‌‘भाचीला शंका घेण्याचे कारण नाही. ती कायम मामाबद्दल बोलत असते. तिला बोलण्याचा अधिकार आहे. मामा शांत स्वभावाचा. तो सगळं सहन करतो. मी शांंत आहे, कोणाला त्रास देत नाही. मला त्रास द्यायला आवडत नाही. चिंता करू नका, निवडणूक आपणच जिंकणार, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्नेहलता कोल्हे यांना देतानाच कोपरगाव पालिकेवरील सत्तेच ‌‘पण‌’ केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT