कर्जत: कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांचे समाधी मंदिराचे जुने ट्रस्टी काढून त्या जागेवर नव्याने ट्रस्टी नेमण्यात आले आहे. या नव्या ट्रस्टीला गावकऱ्यांसह मानकरी व पुजारी यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने ती वादात सापडली आहे. कर्जत बंद ठेवत गावकऱ्यांनी मंदिरासमोर धरणे आंदोलन करत निषेध नोंदविला. वारकऱ्यांनी या आंदोलनास पाठबळ दिल्याने कर्जतमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
16 मार्च 1954 मध्ये ए 381 नुसार गोदड महाराज समाधी मंदिर ट्रस्ट अस्तित्वात आले. नवीन ट्रस्टी नियुक्ती करताना जुन्यांना त्यातून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. नवीन ट्रस्ट निर्मितीच्या विरोधात शनिवारी कर्जत शहर बंद ठेवण्यात आले. सकाळपासूनच शहरात दिसवभर कडकडीत बंद पाळण्यात आला. मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी भजन करून या आंदोलनास पाठिंबा दिला. एका मागोमाग घडलेल्या या घटनांनी शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाने सर्वत्र बंदोबस्त ठेवलेला होता. आंदोलनादरम्यान अनेकांचा कंट दाटून आला तर काहींना आश्रू अनावर झाले.
नवीन ट्रस्टी रद्द करावे, ज्यांनी हे सर्व प्रकरण तयार केले आहे त्यांनी स्वतः धर्मादाय आयुक्त यांच्याकडे जाऊन आम्ही स्वतःहून हे नवीन ट्रस्ट रद्द करत आहोत आणि पूर्वीच्या ट्रस्टीला मान्यता द्या असा अर्ज करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी केली. दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, हभप दत्तात्रय शिंदे, अशोक खेडकर, संतोष नलावडे, प्रा. शिवाजी धांडे, डॉ. नितीन तोरडमल, प्रा. प्रकाश धांडे, ॲड. बाळासाहेब शिंदे, संजय भैलुमे यांच्यासह आंदोलकांनी लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
धर्मदाय आयुक्तांची भूमिका संशयास्पद?
16 मार्च 1954 क्रमांक ए 381 नुसार ग्रामदैवत गोधड महाराज यांचे ट्रस्ट अस्तित्वात आलेले आहे. ते रद्द करताना धर्मदाय आयुक्त अधिकाऱ्यांनी कोणत्याही नियमांची अंमलबजावणी केली नाही हे आता स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत गावकरी सर्व माहिती देणार आहेत.
माळंगीचे मतदार अन् कर्जतचे ट्रस्टी
संत गोदड महाराजांचा जन्मोत्सव, यात्रा दिंडी, सप्ताह, अशा अनेक महाराजांच्या जुन्या रितीरिवाज, परंपरा यांना मोडीत काढून त्यांच्या नावाने दुसरी दिंडी,जन्मोत्सव, सप्ताह, अन्नछत्र मंडळ तयार करून त्याठीकाणी स्वतःची ट्रस्ट कागदोपत्री दाखवून मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संत गोदड महाराज सर्वांचे ग्रामदैवत आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी भक्त हात जोडतात त्याच आम्हालाही हात जोडावे, हा त्यामागील उद्देश आहे. स्वतःला महाराजांपेक्षा मोठे स्थान मिळावं यासाठी हा खटाटोप करणारे कर्जतचे रहिवाशी देखील नाहीत. त्यांची नावे माळंगी गावातील मतदार यादीत नाव आहेत.
दिशाभूल करत नव्या ट्रस्टीची स्थापना!
कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज समाधी मंदिरावर महाराजांच्या हस्तलिखित बक्षीसपत्रानुसार सर्व हक्क आणि वारसा वंशपरंपरागत महाराजांचे पट्टशिष्य वै. भिमाजीबुवा काकडे व वै. उमाबाई भिमाजीबुवा काकडे यांचे वारसदार यांच्याकडे आहे. मंदिर कायद्यानुसार धर्मदाय कार्यालयात 1954 मध्ये नोंदणी देखील आहे. महाराजांनी बक्षीसपत्रावर दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंदिरातील दररोजची नित्यपूजा, नेवैद्य, त्रिकाल नंदादीप पूजा, सण, उत्सव, जन्मोत्सव, समाधी सोहळा, रथयात्रा, पंधरवाडी दिंडी, कर्जत ते पैठण दिंडी तसेच सर्व संतांच्या पुण्यतिथी जयंती हिंदू धर्मातील सण उत्सव हे अखंडित पणे मंदिरातील काकडे कुटुंबावियांचे ट्रस्ट यांच्या देखरेखीखाली सुव्यवस्थितपणे सुरू आहे. यापूर्वीचे सर्व निकाल काकडे कुटुंबियांच्या बाजूने लागलेले असून तशी कागदपत्रे व नोंदी आहेत. चुकीच्या माहिती आधारे मंदिर ट्रस्टच नाही, असा खोटा दावा करत 1954 च्या ट्रस्ट कायद्यानुसार तोच नंबर वापरून धर्मदाय आयुक्त कार्यालयात नव्याने नोंदणी करण्यात आली. धर्मदाय आयुक्तांनी कोणतीही शहानिशा व चौकशी न करता नवीन ट्रस्टीला मंजुरी दिल्याचा आरोप मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केला.
काही समाजकंटकांनी गोदड महाराज समाधी मंदिराचे राजकारण सुरू केले आहे. मंदिराचे मानकरी हे सर्व समाजातील बारा वाड्यात अठरापगड जातीचे नागरिक असल्याचा उल्लेख आहे. आमच्या पाटील कुटुंबीयांना वंशपरंपरेनुसार सेवा करण्याचा मान मिळालेला आहे. मात्र खोटी पुरावे तयार करून नवीन ट्रस्ट तयार केले आहे. धर्मादायुक्तांनी सर्व पुरावे पुन्हा तपासावेत.बाळासाहेब मेघनाथ पाटील, मुख्य मानकरी
कोणालाही विश्वासात न घेता धर्मादाय आयुक्तांकडे नवीन ट्रस्टीची नोंदणी केली गेली. नवीन अस्तित्वात आणलेले ट्रस्टी बेकायदेशीर असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच ज्यांनी नवीन ट्रस्टी तयार केले आहेत त्यांनी स्वतःहून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज देऊन स्वतःहून ते रद्द करावे.अंबादास पिसाळ, बिभीषण खोसे, शशिकांत पाटील
कर्जतचे ग्रामदैवत श्री गोदड महाराज यात्रा, जन्मोत्सव, कुस्त्यांचे फड, जुन्या परंपरा, रितीरिवाज मंदीराचे रथाचे मानकरी, पुजारी, गावातील बारा वाड्यांमधील मानाचे जुने मानकरी, भक्तजन, भजनी मंडळ या सर्वांना अंधारात ठेवून कर्जतमधील काही व्यक्तींकडून ग्रामदैवत गोदड महाराजांनाच चोरण्याचा घाट घातला जात आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी मंदिराचा सर्व कारभार ताब्यात घेण्यासाठीचा हा डाव आहे.नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष