गणेश जेवरे
कर्जत: एखाद्या शहराची ओळख केवळ त्याच्या रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही, तर तेथील नागरिकांच्या जाणीवपूर्वक कृतींनी घडते. शहरातही अशीच सकारात्मक परिवर्तनाची कहाणी घडवून आणली आहे सर्वसामाजिक संघटना यांनी. गेल्या 2000 दिवसांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता आणि पर्यावरण चळवळीने आता एक नवा टप्पा गाठत या संघटनेने कर्जत बस स्थानकाचा चेहरामोहरा पूर्णतः बदलून टाकला आहे.
एकेकाळी कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे ओळखले जाणारे बसस्थानक आज स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी ठिकाण बनले आहे. या परिवर्तनामागे केवळ रंगरंगोटी नाही, तर विचारांची उंची आहे.
स्थानकाच्या भिंतींवर साकारलेल्या चित्रांमधून स्वच्छतेचा, पर्यावरण संवर्धनाचा आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश दिला जात आहे. या बोलक्या भिंती आता प्रत्येक प्रवासाशी, तसेच परिसरातील व्यवसायिकांशी संवाद साधत त्यांना विचार करायला भाग पाडतात.
या उपक्रमाची खरी ताकद म्हणजे संघटनेच्या कार्यकर्त्यांची निःस्वार्थ वृत्ती. श्रमदानाच्या माध्यमातून त्यांनी केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. प्रत्येक सकाळी एकत्र येऊन झाडांचे संगोपन करणे, त्यांची काळजी घेणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणे ही त्यांची दिनचर्या बनली आहे.
विशेष म्हणजे या संघटनेने आतापर्यंत शहरात दीड लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवड करून त्यांचे संगोपनही यशस्वीपणे केले आहे. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांना जिवंत ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे, हे त्यांच्या कामाचे वेगळेपण अधोरेखित करते.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून नगरपंचायतीला राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचा मान मिळाला होता. कर्जत बसस्थानक केवळ प्रवासाचे ठिकाण राहिले नाही, तर ते स्वच्छता आणि पर्यावरणाच्या चळवळीचे जिवंत उदाहरण बनले आहे.
सर्वसामाजिक संघटनेच्या या कार्यातून आपण बदललो, तर शहर बदलते हा संदेश ठळकपणे समोर येत असून, इतर शहरांसाठीही हा एक अनुकरणीय आदर्श ठरत आहे.
स्वच्छता ही केवळ मोहीम नसून ती आपली जबाबदारी आहे. कर्जत बसस्थानकाचा झालेला हा बदल म्हणजे सामूहिक प्रयत्नांची ताकद असून, पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे, हाच आमचा उद्देश आहे.सुनील भोसले, शिलेदार, सर्वसामाजिक संघटना