जामखेड: जामखेड शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. शहरातील संवेदनशील भागांत तत्काळ पोलिस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नागेश्वर मंदिर रस्ता आणि गुगळे प्लॉटिंग परिसर, नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक वाचनालय व नाना-नानी पार्क परिसर, शंकर मूर्ती पाठीमागील रस्ता, लेणीवाडी आणि भुतवडा रस्ता, तसेच विंचरणा नदीकाठचा संपूर्ण परिसर या ठिकाणी समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सकाळी आणि सायंकाळी व्यायाम किंवा फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, काही तरुण दुचाकीवरून वेगाने फिरत पाठलाग करून त्रास देत असल्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही निर्जन स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला उघडपणे धूम्रपान, मद्यपान, तसेच इतर नशिल्या पदार्थांचे सेवन होत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
महिलांच्या दागिन्यांची चोरी करण्याचा प्रयत्न होणे, तसेच लहान मुलांसोबत असलेल्या महिलांना त्रास देणे अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याशिवाय बसस्थानक, खर्डा चौक आणि नागेश विद्यालय परिसरात शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 5 ते 8 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संबंधित परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवा, उघडपणे नशा करणाऱ्यांवर व टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या दुचाकीस्वारांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी शहाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, जावेद कुरेशी, इस्माईल भाई सय्यद, अर्चना राळेभात, बिलाल शेख, सचिन शिंदे, प्रदीप शेटे, कुंडल राळेभात, आकाश पिंपळे, बाबासाहेब मगर, संदिप गायकवाड, अमोल गिरमे, हरिभाऊ आजबे, दीपक घायतडक, बजरंग डुचे,दत्ता डिसले यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.फ
गंभीर दखल घेण्याची अपेक्षा
जामखेड शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि परिसरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.