नगर: महाविद्यालये तसेच प्राध्यापकांच्या पगारासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे दायित्व जपले तर ‘खासगी क्लासेस’ची गरजच भासणार नाही. काही नेत्यांची महाविद्यालयेच खासगी क्लासेसला चालविण्यास दिली, अशी जोरदार टीका करीत या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची तसेच खासगी क्लासेस बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेबाबत आता नीट विचार करावा लागणार आहे. लाखो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची लूट खासगी क्लासेस करीत आहेत. राज्यातील काही शिक्षण संस्था आपली महाविद्यालये त्यांना देऊन हिस्सेदारी उकळत आहेत. शासनाने अशा महाविद्यालयांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करणे आवश्यक आहे. शासनाचे अनुदान घेणाऱ्या संस्थांबरोबरच प्राध्यापकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उत्तरदायित्व दाखविण्याची गरज आहे.
खासगी क्लासेसला आळा घालण्यासाठी प्राध्यापकांनीच आपापल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षेचे क्लासेस सुरू करावेत, अशी मागणी पालकमंत्री विखे पाटील यांनी केली. जिल्ह्यात बारा महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. धरणांतील पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी शासनाने धरणांतील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मुळा धरणासह राज्यातील जायकवाडी, कोयना, हातनूर, गोसे खुर्द व उजनी या सहा मोठ्या धरणांतील गाळ काढला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
होलसेल धुलाई
विरोधकांकडे आता विषय राहिला नाही. त्यामुळे त्यांची भाजपविरोधात ओरड सुरू आहे. पश्चिम बंगाल देशापासून तोडण्याचा डाव होता. देशाच्या विरोधात वातावरणनिर्मिती करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत होलसेल धुलाई झाल्याची टीका पालकमंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केली.
सीना नदीचे सुशोभीकरण
अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे गटारात रूपांत्तर झाले आहे. अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेल्या या नदीचे जलसंपदा विभागाच्या वतीने सुशोभीकरण केले जाणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. सुमारे 14 किलोमीटर नदीचे सुशोभीकरण केले जाणार असून, त्यापैकी साडेतीन कि.मी.चे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 5 जूननंतर अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणाबाबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.