Ahilyadevi Holkar Pudhari
अहिल्यानगर

Ahilyadevi Holkar Jalyatra: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन

25 ते 29 एप्रिल दरम्यान जलसंवर्धनाचा संदेश; चौंडी आणि त्र्यंबकेश्वर येथून यात्रेला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

नगर: जलसंपदा विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे 25 ते 29 एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 25 एप्रिल रोजी एकाच वेळी सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र महेश्वर येथे होणार असल्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या आयोजनाबाबत चौंडी येथे झालेल्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी नगर येथे पत्रकारांना माहिती दिली. त्र्यंबकेश्वर येथे यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे असतील. इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर बहाद्दूर उपस्थित असतील. चौंडी येथून यात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथून बसद्वारे ही जलयात्रा नाशिक, सिन्नर मार्गे संगमनेरात मुक्कामी येणार आहे. संगमनेरात शोभयात्रा काढण्यात येणार आहे. 26 एप्रिल रोजी ही यात्रा शिर्डीला मुक्कामी पोहोचणार आहे. चौंडी येथून निघणारी जलयात्रा अहिल्यानगरात 25 एप्रिल रोजी मुक्कामी थांबणार आहे. 26 एप्रिल रोजी नेवासा, श्रीरामपूरमार्गे ती शिर्डी मुक्कामी पोहोचणार आहेत. या दोन्ही यात्रेत प्रत्येकी 300 वारकरी आणि 500 जलयात्री व चित्ररथ सहभागी होणार आहेत.

29 एप्रिल रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नर्मदा नदीत जलकुभांतील पाणी अर्पण केले जाईल. या संपूर्ण यात्रेत आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगत विखे पाटील म्हणाले.

शिर्डीत 31 जलकलशांचे पूजन

या यात्रेच्या शिर्डी मुक्कामी ‌‘मराठी लोककला‌’ कार्यक्रम होईल. शिर्डीतच राज्यातील 30 नद्यांच्या खोऱ्यांतून आणलेले जलकलश एकत्रित केले जातील. अशा 31 जलकलशांसह ही जलयात्रा छत्रपती संभाजीनगर, धुळे या जिल्ह्यांतून मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र महेश्वरकडे मार्गस्थ होणार आहे.

जलयात्रा प्रभावी ठरणार: शिंदे

चौंडी येथील बैठकीत सभापती राम शिंदे म्हणाले, की ही जलयात्रा प्रभावी ठरणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती व सीना नदीतील पवित्र जल घेऊन जाणारी यात्रा ही ऐतिहासिक घटना असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT