श्रीगोंदा: अहिल्यानगर - पुणे महामार्गावर असलेल्या गव्हाणेवाडी परिसरात येथे जुन्या वादातून दोन जणांवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र गोळ्या मिस फायर झाल्याने सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास गव्हाणेवाडी हद्दीत दोन तरुण उभे असताना एका चारचाकी गाडीतून काही जण आले. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दोन तरुणावर गोळीबार केला.
हल्लेखोरांनी तीन वेळा गोळीबार केल्याची माहिती आहे. गोळ्या भरकटल्याने दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. गोळीबारानंतर हल्लेखोर चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने पसार झाले. दरम्यान ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला अन् ज्यांनी गोळीबार केला त्या दोन्ही गटातील तरुण पारनेर तालुक्यातील असल्याचे समजते.
आरडाओरड झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाहणी केली आहे.या घटनेमुळे गव्हाणेवाडी व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.