शेवगाव: खरीप हंगाम २०२६मध्ये सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बियाणे व कृषी निविष्ठांच्या वितरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत चेडे चांदगाव व सुळे पिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
काही मोजक्या शेतकऱ्यांनाच शासनाचे कापूस बियाणे देण्यात आले, तर अनेक पात्र शेतकऱ्यांना बाजारातून पैसे भरून बियाणे घ्या, असे सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, कृषी विभागामार्फत आलेल्या बियाण्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने न करता ठरावीक लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात आला. इतर शेतकऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित कृषी सहायकांनी ‘हे बियाणे फक्त शेतकरी गटासाठी आहे’ असे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचे बियाणे नेमके कोणासाठी होते? सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी की निवडक गटासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे सरकारकडून बियाणे उपलब्ध असतानाही अनेक शेतकऱ्यांना बाजारातून पैसे भरून बियाणे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार खरा असेल तर शासनाच्या कृषी योजनांनाच हरताळ फासणारा असून, शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनात चेडे चांदगाव व सुळे पिंपळगाव येथे किती बियाणे व कृषी निविष्ठा प्राप्त झाल्या, त्या कोणत्या योजनेतून आल्या, लाभार्थी निवडीचे निकष काय होते, वितरण नोंदवही, लाभार्थी यादी आणि मंजुरी आदेश सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
तसेच पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवून वितरणात पक्षपातीपणा झाला असल्यास संबंधित कृषी सहाय्यक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाच्या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.