अॅड. विजय सोनवणे
खेड: महाराष्ट्राच्या समाजवादी विचारविश्वाला दिशा देणारा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध आयुष्यभर निर्भीडपणे लढणारा सत्याग्रही योद्धा, युवकांच्या हातात परिवर्तनाची मशाल देणारा प्रेरणास्रोत आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा दूरदृष्टीचा शिल्पकार हरपला. युवक क्रांती दल (युक्रांद)चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार, गांधीवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी, समाजवादी आणि ग्रामीण विकासाच्या चळवळीचा आधारवड कोसळल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
डॉ.सप्तर्षी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ डॉक्टर म्हणून सुखकर आयुष्याचा मार्ग स्वीकारला नाही. समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांनी स्वतःला जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले. १९६७ मध्ये त्यांनी युवक क्रांती दल (युक्रांद) या संघटनेची स्थापना करून हजारो युवकांच्या मनात सामाजिक परिवर्तनाची ठिणगी चेतवली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 'संपूर्ण क्रांती'च्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
आणीबाणीच्या काळात सत्तेसमोर झुकण्याऐवजी त्यांनी तुरुंगवास पत्करला. 'मिसा' अंतर्गत त्यांना कारावास भोगावा लागला, मात्र तत्त्वांशी तडजोड करण्यास त्यांनी कधीही संमती दिली नाही. १९७८ मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांचे राजकारण सत्तेसाठी नव्हे, तर समाजकारणासाठीच राहिले. खेड (ता.कर्जत) ही भूमी त्यांची कर्मभूमी ठरली.
भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकासाचा आदर्श उभा केला. शिक्षण, शेती, जलसंधारण, पर्यावरण, ग्रामविकास, स्वावलंबन आणि सामाजिक प्रबोधन यांचा संगम घडवून त्यांनी ग्रामीण भागात परिवर्तनाची चळवळ उभारली. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आणि महाविद्यालयाच्या स्थापनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दालने खुली केली. आज राज्यभर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले हजारो विद्यार्थी त्यांच्या विचारांचे जिवंत वारसदार आहेत.
प्रभावी वक्ते, अभ्यासू लेखक आणि गांधीवादी तत्त्वांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. येरवडा विद्यापीठातील दिवस, यात्री, स्वप्नांच्या सापळ्यांचा देश-अमेरिका यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी सामाजिक आणि राजकीय वास्तवाचे परखड विश्लेषण मांडले. 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी वैचारिक प्रबोधनाची परंपरा अखंड सुरू ठेवली. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन ही सत्य, संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचारांची एक उज्ज्वल परंपरा आज पोरकी झाल्याची वेदना आहे. खेड परिसरासाठी ही अपरिमित हानी मानली जात असून, त्यांच्या स्मृती आणि विचार पुढील अनेक पिढ्यांना समाजपरिवर्तनासाठी प्रेरणा देत राहतील, अशी भावना व्यक्त होत आहे.