संगमनेर : संगमनेरहून साकूरकडे जात असलेला एसटी बस नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात उलटून शालेय विद्यार्थ्यांसह 10-12 जण जखमी झाले. गुरुवारी (दि.16) सकाळी हा अपघात झाला. चंदनापुरी घाटात एका धोकादायक वळणावर ही बस उलटली. संगमनेरहून साकुरकडे जाणारी एसटी बस (एमएच 07 सी 9252) चंदनापुरी घाटातून जात असताना धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली. जखमींवर वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वांबळे यांच्यासह डोळासने महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.(Latest Ahilyanagar News)
वऱ्हाडाची गाडी पुलावरून पाण्यात!
कर्जत : कर्जत-श्रीगोंदा रोडवरील हिरडगाव लोहकारा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाजवळ आज सकाळी मोठा अपघात घडला. लग्नावरून परतणारे वराड घेऊन जाणारी गाडी बायपास पुलावरून घसरत थेट पाण्यात पलटी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ थोडक्यात टळला.
हे वऱ्हाड घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथील लग्न समारंभावरून कर्जतमार्गे परतत होते. गाडीत 25 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलगी प्रवास करत होते. पुलावर तात्पुरत्या बायपासचा रस्ता तयार करण्यात आला असून त्यावर प्रकाशव्यवस्था, सूचना फलक किंवा सुरक्षित रेलिंगचा अभाव असल्याने अपघाताचा धोका कायम आहे.
स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त होत असून, लोहकारा पुलाचे बांधकाम अक्षम्य दिरंगाईने सुरू असल्याने प्रवाशांना अशा जीवघेण्या परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामाला गती देऊन योग्य सुरक्षितता उपाय न करण्यात आले, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. प्रवाशांची आणि नागरिकांची मागणी आहे की या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा.