संगमनेर: संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. दमणगंगा - वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्याने लवकरच या भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी मिळवून देण्यात यश आले असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरिभाऊ गीते, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, भोजापूर चारीच्या रखडलेल्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे चारीचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. चारी आता जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्यामुळे भविष्यातील कामांना गती मिळणार आहे.
याशिवाय, चारीच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेऊन 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो शासनाला सादर देखील करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रस्तावांतर्गत पाणी वाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे, पूर नियंत्रण तसेच अधिक क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.
भविष्यात संगमनेर तालुक्यातील पठारी भाग असलेल्या साकूर व पंचक्रोशीतील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येत आहे. त्याचाही प्रारंभ लवकरच करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मनोगत व्यक्त केले.
33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
तुमचे योगदान काय, आठ महिन्यांत चारी केली का?
दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार केली. यंदा मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने चारीला पाणी आल्याचा आनंद आहे. मात्र या चारीमध्ये तुमचे योगदान काय? असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
नान्नज दुमाला दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखान्याने संयुक्त खर्चातून चारी करण्याचे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली.
1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोंबर 2006 मध्ये येथे पाणी पूजन केले.
जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये चारी दुरुस्ती, सेतू पुल, काँक्रीट कामे, लांबी करता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी गावांकरता मिळावे याकरिता पाठपुरावा केला. ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली.
2021 मध्ये चारीच्या दुरुस्ती करता पुन्हा 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केल्याचे जनतेला माहित आहे.
यंदा मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले. कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापूर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. त्याचा सर्वाधिक आनंद आहे.
ही चारी मागील आठ महिन्यात झाली का? असा सवाल करताना या चारीच्या कामात आपले योगदान काय? असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व आ. खताळ यांना विचारला आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.