संगमनेर: भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी म्हाळुंगी नदीत सोडल्याने काल शुक्रवारी (दि.२४) संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. पुराचे वाढते पाणी पाहता नगरपालिका प्रशासनाने साईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी दिली. संगमनेर खुर्दकडे जाणारा छोट्या पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे.
अकोले तालुका परीसरात जोरदार पाऊस होत असल्याने ओढे-नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी, गुरुवारी दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने आढाळा धरण भरले आहे. त्यामुळे त्याचा विसर्ग वाढविला असून म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या पुरापासून धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे.
शहरातील साईनगर, अकोले नाका परिसरात असलेल्या माळुंगी नदीला पूर आल्याने साईनगर, अकोले नाका परिसरातील नदिकाठी घरे असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पालिकेचे मुख्याध्याकारी दयानंद गोरे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा पथक साईनगर परिसरात तैनात करण्यात आले आहे.
ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदी जवळ घरे असणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी हा पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. म्हाळुंगी नदीला पूर आल्याने प्रवरा नदीही दुथडी भरून वाहत आहे.
नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक साईनगर, अकोले नाका, म्हाळुंगी नदी परीसरात तैनात केले आहे. साईनगर येथील एका कुटुंबाच्या घराजवळ पुराचे पाणी आल्याने कुटुंबाचे त्याचे नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संगमनेर खुर्दकडे जाणारा छोटा पुलाकडील रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद केला आहे.दयानंद गोरे, मुख्याध्याधिकारी