नगर: श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटच्या बुरुडगाव रस्त्यावरील चाणक्य चौकातील शाखेत संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत न करता २ कोटी ४४ लाखांचा अपहर केल्याच्या आरोपावरून चेअरमन व सात संचालकांविरु्द्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हाईस चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य (दोघे रा. बालमटाकळी, शेवगाव), संचालक नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, नगर), शांतिनाथ नागनाथ साखरे, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयशाली मयुर वैद्य (सर्व रा. बाळमटाकळी, शेवगाव) अशी गुन्हा झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत ठेवीदार सतीश रामचंद्र पटारे (वय ५४, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी आणि इतर काही साक्षीदारांनी श्री भगवान बाबा मल्टिस्टेटच्या बुरूडगाव रोड चाणक्य चौकातील शाखेत मुदत ठेव आणि फिक्स डिपॉझिट रक्कम ठेवली होती.
सर्व गुंतवणूकदारांची मिळून एकूण २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपये एवढी रक्कम संस्थेकडे जमा होती. या ठेवींची मुदत संपल्यानंतर फिर्यादी आणि इतर ठेवीदारांनी संस्थेकडे पैशांची मागणी केली.
मात्र, संस्थेने प्रशासनाने ही रक्कम व्याजासह परत करण्यास स्पष्ट नकार दिला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून संपूर्ण संस्थेची व गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत.