अकोले: तालुक्यातील भोजदरी येथे इच्छेविरोधात मजुरांकडून खडी फोडण्याचे वेठबिगारीचे काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुकादम करण पंडित म्हस्के (रा.तांभोळ) याच्यावर राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठ मजुरांची वेठबिगारीतून मुक्तता करण्यात आली आहे.
शरद रामदास भोये (रा. बोटोशी ता.मोखाडा,पालघर) यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची आत्या चांगुना भगवान बाघ ही मजुरी कामानिमित्त भोजदरी (ता.अकोले) येथे आलेली होती. शरद हे खडकी येथे मजुंरासोबत कामासाठी होते. करण पंडित म्हस्के (रा.तांबोळ ता.अकोल)े हा 500 रुपये ट्रॅक्टरप्रमाणे दगड फोडून खड़ी ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम करुन घेत होता.
सर्वांकडून खडी फोडण्याचे वेठबिगारीचे काम करुन घेवून ठरल्याप्रमाणे कमी पैसे देत होता. रहाण्याची व जेवणाची सोय करत नव्हता. पैसे मागितले तर शिवीगाळ व दमदाटी करत होता, अशी माहिती आत्या चांगुना हिने शरद यांना दिली. त्यानंतर शरद यांनी फेब्रुवारी 2026 मधे अमृतवाहीनी ग्राम विकास मंडळ अहिल्यानगर या संस्थेच्या हेल्पलाईनवरती संपर्क साधत वेठबिगारीची माहिती दिली.
अमृतवाहिनीचे गोरख धात्रक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला. त्या ठिकाणाहून संबंधित इसमाना वेठबिगारीच्या जाचातून मुक्त करण्याचे आदेश झाले. अकोलेचे निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे, कामगार आयुक्त कार्यालयाचे आप्पा चाचे, अमृतवाहीनी ग्राम विकास मंडळ संघटनेचे गोरख धात्रक व पोलिस पथकाने भोजदरी येथे धाव घेतली.
त्या ठिकाणी चौकशी केली असता, करण पंडित म्हस्के हा भगवान शंकर वाघ, चांगुना भगवान वाघ, वैशाली भगवान वाघ, मंगेश भगवान वाघ, मधु भिका भोये, सिता मधु भोये, शाम बाळु वाघ, सुमन शाम वाघ याच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेवून त्यांच्याकडुन वेठबिगारीचे काम करुन घेत असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, करण म्हस्के याच्याविरोधात राजूर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.