नगर: जिल्ह्यातील २७ जण नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेले असून, ते सर्व जण सुखरुप आहेत. शनिवारी (दि.२९) हे सर्वजण लुंबिनी येथून अयोध्याला रवाना होणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
नेपाळमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयामुळे रस्ते, पूल, टॉवर वाहून गेले. त्यामुळे नेपाळला गेलेले जवळपास ८० भारतीय पर्यटन अडकून पडल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील किती पर्यटक वा भाविक नेपाळला गेले याबदृल कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला वा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला उपलब्ध झाली नव्हती. शुक्रवारी (दि.२८) शासनाच्या वतीने माहिती उपलब्ध झाली.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील एन्जॉय टूर ॲण्ड ट्रॅव्हल कंपनी ४५ पर्यटकांना घेऊन नेपाळला गेली आहे. यामध्ये नगरचे २७, नाशिकचे १२, पुण्याचे ५ तर मुंबईच्या एका जणाचा समावेश आहे. जिल्ह्यातील २७ मधील बहुतांश पर्यटक हे संगमनेर तालुक्यातील असल्याचे समजते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य निर्मलाताई गुंजाळ यांचाही समावेश आहे.
शासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिलेल्या माहितीनुसार सर्वच ४५ पर्यटक सुखरुप आहेत. हे सर्व पर्यटक गुरुवारी (दि.२७) नेपाळमधील किटवन येथे मुक्कामी होते. तेथून ते शुक्रवारी (दि.२८) भारताजवळील लुंबिनी येथे मुक्कामी थांबले आहेत. शनिवारी (दि.२९) हे सर्वजण लुंबिनी येथून अयोध्याकडे निघणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांनी दिली.