नगर: बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करा. खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पीक विमा कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.15) खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी अतिरिक्त सीईओ विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ.जी.के.ससाणे, डॉ.प्रशांत बोडके, दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे तसेच उपविभागीय महसूल, कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, विशेषतः सीमावर्ती भागांतून येणाऱ्या बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कापूस, सोयाबीन व रब्बी ज्वारीच्या बियाण्यांमध्ये झालेल्या फसवणुकीची गंभीर दखल घेत अनधिकृत विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरेदी केलेल्या खतांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ कंपनीकडून 100 किलोमीटरपर्यंत उपलब्ध असलेल्या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
पारंपरिक युरिया व डीएपीला प्रभावी पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापरास प्रोत्साहन द्यावे. असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात 12 हजार 500 एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू असल्याची माहिती या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे व संतुलित खत वापर जागरूकता अभियान पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले,
गावपातळीवर व्हॉट्सॲप गट करा
शेतमजुरांच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन नोंदणीकृत मजुरांना प्रत्यक्ष शेतीच्या कामात सहभागी करून घ्यावे. निष्क्रिय मजुरांबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करा. योजना, हवामान अंदाज व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी गावपातळीवर व्हॉट्सॲप गट तयार करा, उत्पादक कंपन्या, गट व ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
103 परवाने निलंबित; 19 केंद्रांवर गुन्हे
जिल्ह्यात खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणावर विशेष भर असून, आतापर्यंत 11 हजार तपासण्या पूर्ण करून 103 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात 2 पोलिस केसेस व 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जागतिक परिस्थितीमुळे युरिया व डीएपी खतांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन 5 हजार 400 मेट्रिक टन खताचा राखीव साठा निर्माण करण्यात आला असून, त्यापैकी 750 मेट्रिक टन साठा सध्या उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी बैठकीत दिली.