नगर: गेल्या २५ दिवसांत जिल्हाभरात फक्त २४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जवळपास ६८ टक्के पावसाची तूट झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. दोन तीन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोज आभाळ दाटून येत आहे. मात्र, पावसाच्या सरी काही पडत नाहीत. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरत असल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
यंदा ‘एल निनो’चा पावसावर सावट आहे. जून महिन्यात ६१ टक्के तुटीचा पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यात तीन चार दमदार पाऊस सर्वदूर झाला. जुलैअखेरपर्यंत सरासरी २२७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी ११०.८ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्हाभरात शंभर टक्के खरीप पेरणी होऊन पिके वाढीस लागली. पिकांची अधिक वाढ होण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असताना ऑगस्ट महिन्याच्या गेल्या २५ दिवसांत पाऊस जवळपास गायबच झाला.
या कालावधीत सरासरी ७६.९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना दररोज सरासरी १ मिलिमीटर अशा प्रकारे फक्त २४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ६८ टक्के तुटीच्या पावसामुळे पिकांची वाढ खुटली आहे. आणखी आठ दिवस पावसाने ओढ दिल्यास खरीप हंगाम गेल्यात जमा आहे.
गेल्या २५ दिवसांत हवामान खात्याने चारपाच वेळा पावसाचा अंदाज व्यक्त केला. अंदाजानुसार आभाळ भरुन आता पाऊस पडेल असे वातावरण तयार होत नाही तोच, पाऊस गायब होत आहे. पावसाअभावी खरीप पिकांबरोबरच भूजलपातळी खालावली. परिणामी विहिरी ओस पडू लागल्या असून, टंचाईग्रस्त गावांची संख्या येत्या काही दिवसांत वाढलेली दिसणार आहे. एकंदरीत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर पसरले आहे.
धरणे होऊ लागले खाली
जिल्ह्यात सध्या ९२.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील पाणीसाठा रब्बी हंगाम व पिण्याच्या पाणी योजनांसाठी वापरला जात आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिके वाचविण्यासाठी धरणे खाली करण्याची वेळ ऐन पावसाळ्यात आली आहे. मुळा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास येत्या काही दिवसांत भंडारदरा, निळवंडेतून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.