Rabi Crop Disease Pudhari
अहिल्यानगर

Rabi Crop Disease Maharashtra: नगर तालुक्यात ढगाळ हवामानाचा फटका; रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

खरीप वाया गेल्यानंतर रब्बीही संकटात; वाढता खर्च, घटते उत्पन्न याने शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला, तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही विविध रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. उत्पादनखर्च वाढणार असून, उत्पन्न मात्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता असल्याने सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके डोलावत होती. अनुकूल वातावरण व मुबलक पाणी यामुळे सर्वच रब्बी हंगामातील पिके मोठ्या जोमात होती. मागील महिन्यात वातावरणात अचानक बदल झाला होता. वाढलेले धुके व ढगाळ हवामानामुळे पिकांना विविध रोगांनी ग्रासले होते. जोमात असलेली पिके रोगांच्या विळख्यात सापडल्याने बळिराजा चिंतेत पडला होता. महागड्या औषधांची फवारणी व खतांचा वापर करून मागील महिन्यात पडलेल्या रोगांमधून पिकांना कसेबसे वाचवले गेले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्याने सर्व तलाव, बंधारे, नाले तुडुंब भरले होते. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला होता. खरीप हंगामाची भरपाई रब्बी हंगामात होईल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी पिकांची पेरणी व कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. लाल कांद्याच्या सीझनमध्ये भाव गडगडलेले होते. त्यातच अतिवृष्टीमुळे लाल कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याच्या उभ्या पिकात नांगर फिरवला. परंतु गावरान कांदा, गहू, हरभरा, लसूण, चारा पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली.

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा व गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचबरोबर गावरान कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गुलाबी थंडी व पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके मोठ्या जोमात होती. परंतु ढगाळ हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला असून, विविध रोगांनी ग्रासले आहे. ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग पसरले आहेत.

पिकांवर पडलेले रोग!

गहू: मावा, तांबेरा, ज्वारी: चिकटा, मावा, हरभरा: घाटी अळी, मर: कांदा/ लसूण: मावा, तुडतुडे, मर, करपा, डाऊनी, मका: अमेरिकन लष्करी अळी, भाजीपाला-टोमॅटो: अळी, डाऊनी, भेंडी: नागअळी, लाल कोळी, तसेच अळीचा प्रादुर्भाव, कोथिंबीर: भुरीचा प्रादुर्भाव, वांगे: अळीचा प्रादुर्भाव, मेथी: मावा, कोबी/फ्लॉवर: अळीचा प्रादुर्भाव.

ढगाळ हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन, तसेच कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने उच्च दर्जाची कीटकनाशके, बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.
शुभम मोढवे, बळिराजा कृषी सेवा केंद्र
सद्यःस्थितीत गावरान कांदा, गहू, हरभरा, चारा पिके जोमात होती. मागील महिन्यात धुके, दव अन्‌‍ ढगाळ वातावरणामुळे मोठा खर्च करून पिके वाचवली. परंतु पुन्हा ढगाळ वातावरणामुळे सर्वच पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात उत्पन्न मिळेपर्यंत शाश्वती नाही.
बाळासाहेब तवले, शेतकरी, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT