दीपक ओहोळ
नगर: जिल्ह्यातील 4 लाख 34 हजार 874 हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पेरा झाला असून पेरणीची टक्केवारी शंभरीच्या आसपास आहे. त्यात ज्वारीचा पेरा यंदा 75 टक्के झाला; मात्र श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील काही भागात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यामुळे पिकाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही.
त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ज्वारीचा चारा म्हणून उपयोग केला आहे. बहुतांश ठिकाणी ज्वारी आता हुरडा अवस्थेत आहे. गव्हाची पेरणी 120 टक्के झाली असून, बहुतांश ठिकाणी या पिकाला ओंब्या आलेल्या आहेत.
कृषी विभागाने यंदाच्या रब्बी हंगामासाठी एकूण 4 लाख 49 हजार 668 हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी नियोजित केले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे ज्वारीपिकाला पेरणीस अवधी मिळाला नाही. त्यामुळे ज्वारीची पेरणी उशिरा सुरू झाली. बहुतांश ठिकाणी महिनाभर उशीर लागला. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील 1 लाख 23 हजार 374 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. बहुतांश ठिकाणी ज्वारीची उशिरा पेरणी झाली. श्रीगोंदा आणि संगमनेर वगळता उर्वरित तालुक्यांत ज्वारीचे पीक चांगले आले आहे.
यंदा उशिरा पेरणी आणि काही तालुक्यांत बहुतांश ठिकाणी पेरणी कमी झाली. त्यामुळे ज्वारीसाठी नियोजित केलेल्या क्षेत्राइतकी पेरणी झाली नाही. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याची आणि ज्वारीचे भाव भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. गव्हाची पेरणी 120 टक्के म्हणजे 1 लाख 54 हजार 802 हेक्टर क्षेत्रावर झाली. मध्यंतरी थंडीमुळे गव्हाची वाढ उत्तम होऊन बहुतांश ठिकाणी या पिकाला ओब्या आल्या आहेत. हरभरा पिकाची 1 लाख 1 हजार 951 हेक्टरवर पेरणी झाली असून, ते घाटे अवस्थेत आहे. मक्याची 52 हजार 744 हेक्टरवर पेरणी झालेली असून, बहुतांश ठिकाणी कणसे लागण्याची अवस्था आहे.
तालुकानिहाय ज्वारीची पेरणी
नगर 14462, पारनेर 18548, श्रीगोंदा 6973, कर्जत 20422, जामखेड 36521, शेवगाव 2672,पाथर्डी 11535, नेवासा 1072, राहुरी 1700, संगमनेर 4122, अकोले 877, कोपरगाव 763, श्रीरामपूर 489, राहाता 3218. (हेक्टर)