नगर: राज्यासह अहिल्यानगरमध्येही विधानसभा, नगरपालिका आणि आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये देदीप्यमान यश संपादन करून हॅट्ट्रिक केली आहे. आता चौथा धमाका जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळेल. जिल्हा परिषदेवरही महायुतीची सत्ता दिसेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील आशीवार्द बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक व युतीच्या कार्यकर्त्यासमवेत भगवा गुलाल उधळून जल्लोष केला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, सुनील रामदासी उपस्थित होते.
मुंबईत भाजप हाच ब्रँण्ड
ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे निवडणुकीपूर्वीच मी सांगितले होते. तेच निकालातून स्पष्ट झाले. झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत. लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टीका करण्यापलीकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका करून मुंबईत भाजप आणि फडणवीस हेच ब्रॅण्ड आहेत, बाकी ब्रॅण्डचे बॅण्ड वाजल्याची कोपरखळीही त्यांनी ठाकरे बंधूंना लगावली.
महापौर कोणाचा, दोघेही निर्णय घेतील!
निकालानंतर राष्ट्रवादीकडे 27 आणि भाजपाकडे 25 असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे महापौर कोणाचा असेल, याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री विखे पाटील यांनी याबाबतचा निर्णय आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील हे दोघे बसून घेतील. दोघे तरुण आहेत. त्यांनी चांगले कष्ट घेतले, युती अभेद्य ठेवली. त्यामुळे या यशाबद्दल मी दोघांचेही अभिनंदन करतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सर्व निवडी एकमताने करू: डॉ. विखे
ज्या कार्यकर्त्यांनी आमच्या शब्दानंतर अर्ज माघार घेतली, त्यांचे आभार मानतो. हा विजय त्यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि सर्व मतदारांचा आहे. आपण प्रचारात नारा दिला होता, शहरात बदल घडवायचा असेल तर पूर्ण बहुमत पाहिजे, जनतेने त्यास प्रतिसाद देत पूर्ण बहुमत दिले आहे. त्यामुळे आता शहराचा विकास होईल. पहिल्यांदा घोडेबाजार थांबणार आहे, नगरसेवकांच्या बोली लावल्या जाणार नाहीत. महापौर, उपमहापौर व इतर निवडी एकमताने केल्या जातील, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
अहिल्यानगर महापालिकेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. दरम्यान मंत्री विखे पा. यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे आदी उपस्थित होते.
जायंट किलर
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौरांचे मिस्टर अनिल शिंदे यांचा पराभव करत सुजय मोहिते, सेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांना पराभवाची धूळ चारत सागर मुर्तडकर आणि मातब्बर बाबासाहेब नागरगोजे यांच्यावर मात करत विजयी झालेले नवनाथ कातोरे खऱ्या अर्थाने नगरचे जायंट किलर ठरले. सागर मुर्तडकर यांची तोफखाना, मंगलगेट भागात नेहमीच सेनेचे सचिन जाधव यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आ. जगताप समर्थक म्हणून ओळखले जाणारे सागर मुर्तडकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणली.
सुजय मोहिते हे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे चिरंजीव आहेत. नवतरुण असलेले सुजय मोहिते यांनी अनुभवी आणि सेनेच्या तंबूचा खांब असलेल्या अनिल शिंदे यांचा पराभव करत जोरदार धक्का दिला. मोहिते विजयी झालेल्या प्रभाग 15 मधील सेनेचे चारही विद्यमान नगरसेवकांवर पराभवाची नामुष्की ओढावली. या प्रभागात राष्ट्रवादी-भाजप युतीचे चारही नगरसेवक विजयी झाले. नागापूर-बोल्हेगावचा समावेश असलेल्या प्रभाग 8 मधून सेनेचे नवनाथ कातोरे यांनी राष्ट्रवादीचे बलाढ्य बाबासाहेब नागरगोजे यांच्याशी जोरदार लढत दिली. अवघ्या 44 मतांनी कातोरे विजयी झाले असले तरी त्यांनी ज्या मातब्बरांचा पराभव केला, त्याचीच चर्चा अधिक रंगतदार झाली आहे.