नगर: नगर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत हाती घेतलेली सुमारे 41 हजार कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी 31 मे 2026 पर्यंतची डेडलाइन दिली आहे. या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित कामांना पुढील निधी मंजूर केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता मनरेगाऐवजी ‘विकसित भारत रोजगार हमी योजना’ आणि ‘राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (ग्रामीण)’ राबवली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 315 कोटींचा खर्च होऊनही अपूर्ण कामांची संख्या चिंताजनक आहे. संपूर्ण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे बैठक झाली.
यात मनरेगातील अपूर्ण कामांसाठी 31 मेपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी तातडीने जिल्ह्यातील अपूर्ण कामांचा आढावा घेतला आहे. मनरेगाअंतर्गत विविध विकासकामे प्रलंबित असून त्यामध्ये सिंचन विहिरी, ग्रामीण रस्ते, जलसंधारण तसेच इतर रोजगारनिर्मितीशी संबंधित कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
शासनाच्या सूचनेनुसार नवीन कामांना मंजुरी देण्यापूर्वी जुनी अपूर्ण कामे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आदेश भंडारी यांनी दिले आहेत.दरम्यान, निर्धारित वेळेत कामे पूर्ण न केल्यास निधी रोखण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनावर कामे पूर्ण करण्यासाठी दबाव वाढला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोणती, किती कामे अपूर्ण
अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार एकूण 41,844 कामे अपूर्ण आहेत. यापैकी घरकुल 25,941, गुरांचा गोठा 4,727, सिंचन विहिरी 7,784, रस्ते 1,475 आणि इतर कामे 1,917 यांचा समावेश आहे. ही सर्व कामे 31 मेपर्यंत मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.