नगर: माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषदेने नाशिक विभागात आपल्या गुणवत्तेची छाप सोडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विभाग स्तरावर अहिल्यानगर, राहाता, तर जिल्हास्तरावर संगमनेरच्या बीडीओंना प्रथम पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, आव्हाणे बु, लहित खुर्द, जाफराबाद या तीन ग्रामपंचायती विभागात दीड कोटींच्या पुरस्कारासाठी पात्र ठरल्याची माहिती माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी दिली.
राज्यात 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यास सुरुवात झालेल्या माझी वसुंधरा अभियानाचे दि.1 जून 2024 ते दि. 31 मार्च 2025 हे पाचवे वर्ष होते. त्यात राज्यभरातील 27 हजार 895 ग्रामपंचायतींनी यात सहभाग घेतला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालिन नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली उत्कृष्ट कामकाज झाले. त्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूक्ष्म नियोजनाखालील 2025-26 अभियानातील कामकाजाची क्षेत्रीय पाहणी व मूल्यांकन झाले. यात अहिल्यानगर जिल्ह्याला मोठी संधी मिळाली.
जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना 1 कोटी 50 लाखांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभाग स्तरावर तीन ते पाच हजार लोकसंख्या गटात आव्हाने बुद्रुक (ता.शेवगाव); दीड ते अडीच हजार लोकसंख्या गटात लहित खुर्द (ता.अकोले) आणि दीड हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात जाफराबाद (ता.श्रीरामपूर) या गावांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कारासाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मिळणार असून, ही रक्कम गाव विकासासाठी वापरावी लागणार आहे.
जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर संबंधित गावचे सरपंच या सर्वांना अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले.
माझी वसुंधरा अभियानातंर्गत आतापर्यंत 32 ग्रामपंचायतींना एकूण 20 कोटी 65 लाखांचे पुरस्कार मिळाले आहेत. 2025-26 मध्येही जिल्हा परिषदेतून सीईओ आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार जिंकण्याचे उद्दिष्ट आहे.राजेंद्र देसले, नोडल अधिकारी