नगर: गेल्या पाच महिन्यांपासून मतदारांचे ‘मॅपिंग’करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. मात्र, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे या मतदारसंघातील ‘मॅपिंग’ संथगतीने सुरू आहे. येत्या आठ दिवसांत ‘मॅपिंग’ न करणाऱ्या मतदारांना आगामी काळात सुनावणीला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवडणूक यंत्रणेने दिला आहे.
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रात एसआयआर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही वेळी लागू होण्याची शक्यता असल्याने मतदारयादी पडताळणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी 80 टक्के ‘मॅपिंग’चे काम झाले आहे. यामध्ये अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी 58.57 टक्के अशी सर्वात कमी आहे. या मतदारसंघातील 3 लाख 24 हजार 570 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 102 मतदारांनी आतापर्यंत ‘मॅपिंग’ केले. अद्याप 1 लाख 34 हजार 468 मतदारांचे ‘मॅपिंग’ बाकी आहे.
ज्या मतदारांनी ‘मॅपिंग’ केले नसेल अशा मतदारांना आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. ज्या मतदारांचे ‘मॅपिंग’ होणार नाही, अशा मतदारांना आगामी काळात होणाऱ्या मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या सुनावणीस सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.