गोरक्ष शेजूळ
नगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटची दिवशी सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जागा असताना आणि एबी फॉर्म असूनही उमेदवाराला शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही ऐन वेळी ‘घूमजाव’ केले. त्यामुळे भाजपच्या तनपुरेंना बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतूनच अप्रत्यक्ष मदतीचा ‘हात’ दिला जात आहे का, याविषयी जिल्ह्यात तर्कवितर्क लढविले जात आहेत. आता तनपुरेंशिवाय केवळ चार उमेदवारी अर्ज शिल्लक असून, माघारीच्या दिवसाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असताना, महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसमध्ये ‘ऑल ईज नॉट वेल’ अशीच परिस्थती आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीप्रमाणेच आता अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात देखील काँग़्रेसवर नामुष्की ओढवली आहे. मविआत नगरची जागा काँग्रेसला सुटली, पक्षाचा एबी फॉर्मही आला, मात्र शेवटच्या क्षणी उमेदवाराने अर्जच दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणी नीलेश लंके यांनीही ऐन वेळी अर्ज न भरल्याने महाविकास आघाडीतील गोंधळ या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसले.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. काँग्रेसकडून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि नगर शहराध्यक्ष दीप चव्हाण अशी दोन नावे चर्चेत होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे या संदर्भात बैठकही पार पडली होती. ससाणे यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तोपर्यंत त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नव्हता. ‘हायकमांड’कडे यावर खलबते झाल्यानंतर दीप चव्हाण यांना काँग़्रेसचा एबी फॉर्म देण्याचा निर्णय झाला. चव्हाण यांनीही तशी तयारी केली. आवश्यक प्रतिज्ञापत्रही केले. मात्र, रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा शरद पवार गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जागा काँग्रेसला असताना लंके यांच्या पवित्र्याने काँग्रेसचे नेतेही गोंधळात सापडले आणि सोमवारी वरिष्ठ पातळीवरून दीप चव्हाण यांना ‘अर्ज दाखल करू नका, लंके यांनाच अर्ज भरू द्या,’ अशा सूचना आल्याचे समजले. परिणामी, काँग़्रेसच्या वाट्याला अधिकृत जागा सुटलेली असताना, पक्षाचा एबी फार्म असतानाही चव्हाण यांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही, ही काँग्रेससाठी नामुष्कीची बाब समजली जात आहे. दरम्यान, राणीताई लंके यांचाही अर्ज भरण्याचा इरादा रद्द झाला. ‘जागा काँग्रेसला असल्याने’ हे कारण त्यांच्याकडूनही सांगण्यात आले. परिणामी, काँग्रेसवर आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ येऊ शकते.
‘पदवीधर’ची पुनरावृत्ती...
सन 2023 मध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही काँग़्रेसच्या उमदेवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज होता, तर त्यांचे वडील तथा तत्कालीन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी काँग्रेसचा एबी फॉर्म आला; पण तो उशिरा पोहचला! त्यामुळे ऐन वेळी डॉ तांबे यांनी अर्ज भरलाच नाही आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला जागा असतानाही उमेदवार नसण्याची नामुष्की ओढवली होती. त्याची पुनरावृत्ती नगरमध्ये झाल्याचे मानले जाते.
बिनविरोध करण्यासासाठी
मविआत काँग्रेसला नगरची जागा गेली असताना पक्षाने ऐन वेळी चव्हाण यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून का रोखले? याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. दुसरीकडे जागा काँग्रेसला गेली, हे माहिती असतानाही शरद पवार गटाने एक दिवस आधी अर्ज भरण्याची वल्गना का केली, असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत. आता तनपुरे विरोधात केवळ चार उमेदवार आहेत. यात तुल्यबळ करण ससाणेही माघारीच्या ‘मूड’मध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या मदतीने नगरची जागा बिनविरोध केली जाणार का, असेही काही घडामोडी सांगू पाहत आहेत.
कदम, जगतापही थांबले!
सत्यजित कदम नाराज होते. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रीती कदम यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचे सचिन अरुणकाका जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल न करता तनपुरेंसाठी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे दिसले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे विधिमंडळातील भाजपच्या जागा वाढविण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तनपुरे यांच्या विजयासाठी हे प्रयत्न असणार हे नक्की.
राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरले होते. मात्र, ही जागा काँग्रेसला गेल्याने वरिष्ठांच्या सूचनांनुसार, लंके यांचा अर्ज न भरण्याचा निर्णय झाला. आता काँग्रेस देईल, त्या उमेदवाराला महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदान करणार आहोत.संदीप वर्पे, राष्ट्रवादी शरद पवार गट
काँग़्रेसचा एबी फॉर्म मला मिळाला होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाने अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग़्रेसच्या वरिष्ठांपर्यंत्त पोहचली आणि सकाळीच मला वरिष्ठ पातळीवरून अर्ज दाखल करू नका, अशा सूचना आल्या.दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस