

नगर: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 3 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रविवार ते बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार रविवारी (दि.31) काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहिला. तर काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊन रिमझिम झाली.
तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये.
तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
पेरणीची घाई नको
हवामानात बदल होण्यास प्रारंभ झाला असून, आगामी आठवड्यात आणखी बदल होईल. वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी खरीप पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.