अकोले: हरिश्चंद्रगड परिसर, मुळा खोरे, कोतूळ व पिंपळगाव खांड भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीकाठचे कोतुळेश्वर महादेव मंदिर पाण्याने वेढले गेले आहे. कोतूळ बसस्थानकाकडून मंदिराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे परिसरात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नागरिक पूर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करत आहेत.
हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे मुळा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. पिंपळगाव खांड धरणाच्या फुगवट्यामुळे पाण्याचा वेग वाढल्याने नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाकी तलाव ओव्हर-फ्लो
निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कृष्णावती नदीवरील ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला. या जलाशयातून पाणी प्रवरा नदीपात्रातून ओसंडून वाहू लागले असून, निळवंडे धरण जलदगतीने भरण्यास त्याची मदत होणार आहे. दरम्यान, भंडारदरा धरणाचा आजचा पाणीसाठा 3899 दशलक्ष घनफुटांवर पोहचला आहे. परिसरात रतनवाडी येथे 113 मिलिमीटर, पांजरे 86, भंडारदरा 72, घाटघर 140 आणि वाकी येथे 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यातील प्रवरा व मुळा नदी खोऱ्यांच्या उगमापासून ओढे-नाले आता भरून वाहत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा धबधब्यांनी सजल्या आहेत. असाच पाऊस टिकून राहिला तर भातआवणी लवकर सुरू होऊ शकते.
पाण्याची धाव मुळा धरणाकडे; आवक वाढली
गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि जलव्यवस्थापन यंत्रणांसाठी अखेर आशादायी चित्र निर्माण होऊ लागले आहे. कालपर्यंत अत्यल्प आवकेमुळे ‘जैसे थे’ असलेले मुळा धरण आता वाढत्या प्रवाहामुळे नवसंजीवनी अनुभवत आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणाकडे होणाऱ्या आवकेत विक्रमी वाढ झाली असून जलसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी मुळा धरणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. धरणात एकूण ६ हजार ३५६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. धरणाकडे केवळ २ हजार ५३ क्यूसेक इतकीच आवक होत होती. मात्र, मान्सूनने हरिश्चंद्रगडच्या डोंगररांगांमध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावताच परिस्थिती बदलू लागली.
आंबित, कुमशेत, पाचनाई, थडकी, कोतूळ आणि हरिश्चंद्रगड परिसरात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यांचे पाणी मोठ्या वेगाने मुळा धरणाकडे झेपावले आहे.
सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाकडे ६ हजार २६० क्यूसेक इतकी आवक सुरू होती. दुपारी बारा वाजता ती ७ हजार क्युसेकवर पोहोचली. दुपारी तीन वाजता आवकेने थेट १७ हजार ७३७ क्युसेकचा टप्पा गाठला, तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती आणखी वाढून १८ हजार ७२४ क्युसेक झाली.