Heavy rains lashed Bhandardara catchment area, disrupting normal life
अकोले : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणातून ९ हजार ७७४ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १३ हजार ९९४ क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन- चार दिवसापासुन धुव्वाधार पाऊस पडत असल्याने घाटघर उर्ध्व धरण, भंडारदरा, निळवडे, कृष्णावंती धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. बुधवारपासून प्रवरा पाणलोटात पावसाला सुरुवात झाली आहे तर गुरुवारी मध्यरात्री पासून पावसाने उग्र रुप धारण केल्याने साम्रद, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे, कोलटेभे, बारी या आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत. परिसरातील ओडे, नाले दुधडी भरून वाहताना दिसत आहे.आणि मुसळधार पावसामुळे जनावरानसह नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. आदिवासी बांधवांच्या शेकोट्या पुन्हा एकदा पेटल्याचे दिसुन येत आहे तर आपले पशुधन वाचविण्यासाठी आदिवासी शेतकरी बांधवांनी जनावरे घरातच बांधणे पसंत केले. तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने भात रोपाना मोठा फटका बसतो कि काय या विवेचनेत शेतकरी आहेत.
भंडारदरा धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढविला जात असल्यामुळे निळवंडे धरणातुनही पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. परिणामी प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे नदीकाठावर असणा-या नागरिकांना सर्तक राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. पाण्याची आवक वाढल्यास अजून जादा पाणी सोडण्यात येईल असे भंडारदरा धरण शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले
गेल्या चोवीस तासात भंडारदरा येथे १०५ मी मी पावसाची नोंद झाली असुन घाटघर १७७ मी मी , रतनवाडी १८१ मी मी, पांजरे १४३ मि.मी, वाकी ९८ मी मी, निळवंडे ४८ मि.मी, अकोले ४१ मि.मी पावसाची नोंद झाली. वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने कृष्णावंतीतून १५७३ क्युसेसने विसर्ग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी झेपावत असल्याने रंधा धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहेत.
सोमवारी निळवंडे धरणातून १३ हजार ९९४ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सदर विसर्गाची टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रवरा नदीकाठच्या अकोले, संगमनेर व ओझर बंधा-याखालील, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांना व वस्त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.प्रदिप हापसे, कार्यकारी अभियंता, अर्ध्व प्रवरा धरण विभाग, सगमनेर.
भंडारदरा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भंडारदर्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे रंधा धबधबा पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु जमलेली गर्दी पाहून एका पर्यटकांने रंधा येथे प्रवरा नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेऊन स्टंट करत दुसऱ्या कडेला पोहतानाचे दृश्य अनेकांनी मोबाईल व कँमे-यात घेतले आहेत. परंतु पर्यटकांनी पाण्यात उडी मारल्याच्या घटनेची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी रंधा धबधबा व भंडारदरा धरण परिसरात भेट देऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पर्यटक आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.