नगर: जिल्ह्यात घरकुल योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने आता थेट गावपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. दि. 31 मार्चपर्यंत घरकुलाची कामे सुरू न केल्यास पहिला हप्ता घेतलेल्या 15 हजारांची वसूली केली जाणार असून, प्रसंगी जागेवर बोजा चढविण्यासाठीही प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचे समजले आहे. त्यामुळे गावोगावी घरकुलाच्या कामाच्या ‘कुदळी’ टाकून श्रीगणेशा होताना पहायला मिळत आहेत.
जिल्ह्यात गतवर्षी शासनाकडून सुमारे 1 लाख 25 हजार घरकुलांना मंजुरी मिळाली होती. यापैकी 68 हजार घरांची कामे आता तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहेत. संबंधितांना दुसरा 70 हजारांचा हप्ताही मिळाला असून, लवकरच तिसरा हप्ताही दिला जाणार आहे. याशिवाय 25 हजार लाभार्थ्यांनी कामे सुरू केलेली आहेत. मात्र साधारणतः 23 हजार लाभार्थ्यांनी 15 हजारांचा पहिला हप्ता घेऊनही घराची कामे सुरू केलेली नाही.
उलट बँकेतून ही रककम काढून ती अन्य ठिकाणी खर्च केली आहे. त्यामुळे आता एक तर घराचे काम सुरू करा किवा 15 हजारांच्या वसुलीच्या कारवाईला सामोरे जा, अशी वेळ संबंधित लाभार्थ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर, सहाय्यक अभियंता किरण साळवे तसेच संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी यांच्या पथकाकडून जिल्ह्यातील गावोगावी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भेटी दिल्या जात आहेत.
जागेचा, वाळूचा प्रश्न सोडविणार!
ज्यावेळी हे पथक लाभार्थ्यांपर्यंत पोहचते, त्यावेळी त्यांची घर बांधण्याची मानसिकता दिसते. मात्र, आर्थिक विवंचनेत ते सापडलेले दिसतात. याशिवाय, जागेचा किंवा वाळू प्रश्न असेल, अशा अडचणीसंदर्भातही प्रकल्प संचालक ठवकर यांनी लाभार्थ्यांना सहकार्याचे आश्वासित केलेले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दि. 31 मार्चपर्यंत घराचे काम सुरू करा, असे स्पष्ट सांगितले आहे.
..तर कारवाई अटळ
पहिला हप्ता घेतलेल्या पंधरा हजारांची वसुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांना घराचे काम करणे शक्य नसेल, त्यांना 15 हजार परत करावे लागणार आहेत. आणि जर त्यांनी परत केले नाही, तर त्यांच्या जागेवर ‘15 हजारांचा शासकीय बोजा’ चढवला जाणार आहे. हा बोजा कायमस्वरुपी राहणार आहे. ज्यावेळी तो कमी करायचा, त्यावेळी व्याजासह शासन दप्तरी ही रक्कम भरावी लागू शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे घराचे काम सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.
आठ दिवसांत सात हजार घरकुलांचे कामे सुरू
जिल्ह्यात 23 हजार घरांची कामे सुरू झालेली नाही. मात्र, प्रशासन थेट ग्राऊंडवर उतरल्याने लाभार्थांची मानसिकता बदलताना दिसत आहे. कारवाईची भिती किंवा प्रशासनाकडून झालेल्या जनजागृतीचे यश, यातून सुमारे सात हजार घरांची कामे सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा 10 हजारांचा टप्पा ओलांडणार असल्याचे सांगितले जाते.
प्रकल्प संचालकांसमवेत आम्ही घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहोत. त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. त्यांना प्रशासकीय मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळे लाभार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. अनेकांनी कामे सुरू केल्याचा रिपोर्ट आहे. मात्र, आवाहन करूनही कामे सुरू न केल्यास त्यांनी घेतलेल्या हप्त्यांच्या वसुलीसाठी त्यांच्या जागांवर बोजा चढवण्याची कारवाई करावी लागणार आहे.किरण साळवे, सहायक अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा